प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -पुणे आणि नागपूर यांच्यात कायम तुलना होत असते. नागपूरमध्ये अजून पुण्याइतका विकास झाला नाही, आम्ही बरोबरीला येण्याचा प्रयत्न करत आहोत. पुणे आणि नागपूरमध्ये अशीच निकोप स्पर्धा हवी. नागपूरला पुढे आणायचे असले तरी मी आणि देवेंद्र फडणवीस पुण्याकडे दुर्लक्ष करणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
34 व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, उदयनराजे भोसले, सिनेअभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष आणि माजी खासदार सुरेश कलमाडी, पत्नी मीरा, सिनेअभिनेते सुनील शेट्टी, फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते.
गेल्या तीन दशकांपासून अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्या गणेशवंदनेने फेस्टिव्हलची सुरुवात होते. यंदाही हे सातत्य कायम राहिले. त्यानंतर भारतरत्न गानसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांना त्यांची भाची राधा यांनी स्वरसुमनांजली वाहिली. गायक उपेंद्र भट यांचे गायन झाले. याशिवाय सात ते 22 वर्षांच्या 40 वादकांची व्हायोलिन आणि तबला, ढोलकीच्या जुगलबंदीने उपस्थितांना अक्षरश: खिळवून ठेवले.
यावेळी सिम्बॉयसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांना “जीवनगौरव पुरस्कारा’ने, तर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ऍड. एस. के. जैन, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, एन.ए.ए.सी. (नॅक)चे चेअरमन डॉ. भूषण पटवर्धन, गायक राहुल देशपांडे आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना “पुणे फेस्टिव्हल ऍवॉर्ड’ने गौरवण्यात आले.
पुणे आणि नागपूर यांच्यात एकच फरक आहे, तो म्हणजे नागपूरकडे विकासाचे डबल इंजिन आहे, असा उल्लेख गडकरी आणि फडणवीस यांना उद्देशून कलमाडी यांनी केला. त्याचाच संदर्भ घेत गडकरी यांनी भाषणात पुण्याच्या विकासाची ग्वाही दिली.
पुण्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करणार नाही. येथील रस्ते, वाहतुकीचा प्रश्न सोडवणार, असे गडकरी म्हणाले. तसेच, मराठी साहित्य, संस्कृती, नाट्य, संगीत, नृत्य याला जगभरात तोड नाही. हे वैभव टिकवण्याचे काम “पुणे फेस्टिव्हल’ करत आहे. पुणे फेस्टिव्हल हे देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान आहे, अशा शब्दांत गडकरी यांनी कौतुक केले. उदयनराजे आणि हेमामालिनी यांनीही मनोगत व्यक्त केले.
आमदार होण्यापूर्वी इथून निघतो : फडणवीस
मुख्यमंत्री असताना मला पुणे फेस्टिव्हलने एकदा निमंत्रित केले होते. इथे पोहोचेपर्यंत मी उपमुख्यमंत्री झालो. आता फेस्टिव्हल संपेपर्यंत मी मंत्री किंवा आमदार होईल, त्यामुळे सर्वांच्या आधी भाषण करून इथून जायची परवानगी मी घेतली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच सभागृहात खसखस पिकली, मात्र मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्री व्हावे लागले, याची सल कुठेतरी मनात असल्याचे यातून दिसून आले.