पुणे -बाजार समिती निवडणुकीसाठी जागा कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त आहे. नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे जुन्या लोकांनी फार काही अपेक्षा धरू नयेत. पक्षीय स्तरावर पॅनेल करण्याबाबत अंतिम निर्णय लवकर घेतला जाईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. हवेली बाजार समितीच्या तत्कालीन बरखास्त केलेल्या संचालक मंडळाच्या कारभाराच्या चौकशा सुरू आहेत. त्याचा निकाल लागेल तो लागेल, असेही ते म्हणाले.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त आयोजित मतदार मेळाव्यात अजित पवार बोलत होते. आमदार चेतन तुपे, अशोक पवार, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, संचालक सुरेश घुले, प्रकाश म्हस्के, सुनील चांदेरे, त्रंब्यक मोकाशी, बाजार समितीचे माजी संचालक गणेश घुले, विलास भुजबळ, आडतदार शिवाजी सूर्यवंशी, आडते असोसिएशनचे अध्यक्ष बापू भोसले, उपाध्यक्ष सौरभ कुंजीर, गौरव घुले, दूध संघाच्या केशरताई पवार, भरत जांभरे, राजेंद्र खांदवे, संतोष कांचन यांच्यासह विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल, तोलणार आदी मतदार घटक उपस्थित होते.
पवार म्हणाले, आपल्यावर टाकलेली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडायची असते. पारदर्शक कारभार केल्यास समाजासाठी चांगले काम होते. काहीजण केवळ पत्रिकेवर संचालक नाव लागावे म्हणून संचालक मंडळात जातात. बाजार समितीचे संचालक व्हायचे तर वेळ देता आला पाहिजे. बाजार समितीमधील गळती, वजनकाटे आदी खूप बाबी आहेत. पेट्रोल पंपासारख्या योजना बाजार समितीसांठी उत्पन्नवाढीसाठी चांगल्या आहेत. मात्र, पंपाची कॅश घेता कामे नये, असे चिमटेही पवार यांनी मागील संचालकांना काढले.
बाजार समितीचे संचालक मंडळ पक्ष नेतृत्वामुळे नव्हे; तर त्यांच्याच वागणुकीमुळे बरखास्त झाली आहे. स्वार्थी भूमिका ठेवू नये. आता राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल करणे गरजेचे असून पक्षासाठी ते फायद्याचे आहे. चार मूठभर लोकांसाठी पक्ष दावणीला बांधणार असाल तर आमचे काही म्हणणे नाही.
– प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस