राहुरी – राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आज पहिल्या दिवशीच फुले समर्थ कांदा वाणाची 65 लाख रुपयांची बियाणे विक्री झाली. हा एक विक्रमच असून एकूण साडेपाच मेट्रीक टन कांदा बियाणाची विक्री झाल्याची माहिती संशोधन संचालक डॉ. शरद गडाख व बियाणे शास्त्रज्ञ डॉ.आनंद सोळुंके यांनी दिली.
फुले समर्थ या खरीप वाणास राज्यभरातून मोठी मागणी आहे. आज बियाणे विक्री सुरु होणार असल्याने रात्रीपासूनच शेतकरी रांगेत होते. नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यातील शेतकरी होते. प्रत्येक शेतकऱ्यांना तीन किलोची एक पिशवी दिली गेली. सर्वांना कुपनद्वारा बियाणे दिले गेले. शेतकऱ्यांना ऊन, वारे, पाऊस यांचा त्रास होवू नये म्हणून खास मंडप उभारला होता. निवडणूकीप्रमाणे बियाणे मिळालेल्या शेतकऱ्यांना बोटाला शाई लावली गेली. शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली होती. संशोधन संचालक डॉ. गडाख, डॉ. आनंद सोळुंके, बियाणे अधिकारी डॉ. चंद्रकांत साळुंके, डॉ. केशव कदम यांनी बियाणे विक्री केंद्रास भेट दिली. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीची त्यांनी माहिती घेतली. आज अठराशेपेक्षाही जास्त शेतकऱ्यांना बियाणे मिळाले. उद्या बियाणे विक्री सुरु राहणार आहे.