नवी दिल्ली – सन 2007 पासून आत्तापर्यंत 16 चिनी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे आणि इतर 10 चिनी नागरिकांचे अर्ज प्रलंबित आहेत अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात माहिती दिली.
डीएमके खासदार तिरुची शिवा यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. भारतात आत्तापर्यंत किती लोकांनी आश्रय मागितला आहे किंवा नागरीकत्व मागितले आहे या संबंधातील डाटा केंद्र सरकारकडे उपलब्ध नाही अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
नागरीकत्व प्रदान करण्याच्या संबंधात विविध कायद्यांचा विचार करून संबंधीतांच्या अर्जावर विचार केला जातो असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. आज अनेक नागरीकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे पण त्याची माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही यावर काही सदस्यांनी नंतर आश्चर्य व्यक्त केले.