मागील वेळेपेक्षा कामगिरीत सुधारणा होण्याचा विश्वास
नवी दिल्ली – मागील वेळेपेक्षा यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कामगिरीत सुधारणा होऊन पहिल्या टप्प्यात आमच्या जागा वाढतील, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरूवारी 91 जागांसाठी मतदान झाले. त्यापैकी 32 जागा भाजपने मागील वेळी जिंकल्या होत्या. त्याचा संदर्भ देऊन भाजपच्या माध्यम विभागाचे प्रमुख अनिल बालुनी यांनी पक्षाची कामगिरी सुधारण्याबाबत विश्वास व्यक्त केला. मागील वेळी जिंकलेल्या जागा आम्ही राखू. त्याशिवाय, आणखी जागाही जिंकू, असे त्यांनी म्हटले. पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (ईव्हीएम) तक्रारी केल्या. त्यातून त्यांचे नैराश्यच उघड होते, अशी पुस्ती त्यांनी जोडली. संबंधित जागांबाबत भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून चांगला फिडबॅक मिळाला. त्याआधारे पक्षाला कामगिरीत सुधारणा होण्याची खात्री वाटते. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील आमच्या जागा वाढतील, असा दावाही त्यांनी केला.