नवी दिल्ली – राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. भाजपने 3, तर इंडिया या आघाडीतील घटक पक्षांनी 4 जागा जिंकल्या. पोटनिवडणुकांआधी ताब्यात असलेल्या जागांची संख्या कायम ठेवण्यात भाजपला यश मिळाले. मात्र, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील निकाल त्या पक्षासाठी मोठा धक्का ठरले. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाने (सप) बाजी मारल्याने पहिल्या परीक्षेत इंडिया पास झाल्याचे राजकीय विश्लेषण केले जात आहे.
देशाच्या 6 राज्यांमधील 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये त्रिपुरातील दोन्ही जागा सत्तारूढ भाजपने जिंकल्या. त्यामुळे त्या राज्यातील 1 जागा माकपला गमवावी लागली. उत्तराखंडमध्येही सत्तेवर असणाऱ्या भाजपने पोटनिवडणुकीला सामोरी गेलेली तेथील जागा राखली. केरळमधील जागा आपल्याकडे कायम ठेवण्यात कॉंग्रेसला यश आले. झारखंडमधील जागा सत्तारूढ झामुमोने राखली.
विरोधी पक्षांनी देश पातळीवर इंडिया ही आघाडी स्थापन केल्यानंतर त्या पोटनिवडणुका झाल्या. त्यामुळे इंडियाची पहिली राजकीय परीक्षा म्हणून त्याकडे पाहिले गेले. पोटनिवडणुकांत सर्वांधिक महत्व उत्तरप्रदेश आणि बंगालला प्राप्त झाले होते. त्यातही सर्वांधिक लक्षवेधी ठरली ती भाजपशासित उत्तरप्रदेशातील लढत. त्या राज्यातील घोसी मतदारसंघाचे आमदार दारासिंह चौहान यांनी सपला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक झाली.
भाजपने त्यांना पुन्हा रिंगणात उतरवले. तर, सपने सुधाकर सिंह यांना उमेदवारी दिली. त्या लढतीत सिंह यांनी 42 हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. त्यांना 1 लाख 24 हजार 427 मतं मिळाली. तर, चौहान यांना 81 हजार 668 मतांवर समाधान मानावे लागले. सपच्या उमेदवाराला कॉंग्रेस, रालोद आणि इंडियामधील इतर घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता.
बंगालमधील पोटनिवडणुकीचा निकालही लक्षणीय मानला जात आहे. भाजप आमदाराच्या निधनामुळे ती पोटनिवडणूक झाली. ती जागा बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने भाजपकडून खेचून घेतली. त्यामुळे त्या राज्यात तृणमूलचा प्रभाव कायम असल्याचे स्पष्ट झाले.