नगर शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी काढला मोर्चा
नगर – नगर शहरामध्ये आज सकाळी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या भव्य मोर्चात राष्ट्रीय सायंसेवक, विश्व हिंदू परोषद, भाजप, शिवसेना आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गांधी मैदान येथून सुरवात झालेला हा मोर्चा चितळे रोड, चौपाटी कारंजा, जुने कोर्ट गल्ली, वाडिया पार्क, बस स्थानक, पुना रोड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ समारोप करण्यात आला. या वेळी सहभगी झालेले नागरिक भारत माता कि जय…, वुई सपोर्ट सी.ए.ए., अशा जोरदार घोषणा देत होते. शेकडो नागरिकांनी तिरंगा ध्वज व घोषवाक्याचे फलक हातात घेतले होते.
शांततेत व शिस्तीत हा मोर्चा मार्गस्थ झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ या मोर्चाचे सभेतर रुपांतर झाले. यावेळी माजी आमदार अनिल राठोड म्हणाले, स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर भारतात प्रथमच अत्यंत मोठे निर्णय घेतले जात आहे. काश्मीर प्रश्न, राम मंदिर व आता या नागरिकत्व सुधारणा कायद्याची अमलबजावणी होत आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आता या कायद्यामुळे पूर्ण होणार आहे.
सर्व हिंदूंनी एकत्र येऊन या कायद्याचे समर्थन करावे व देश विघातक शक्तींना विरोध करावा. महापौर बाबासाहेब वाकळे, खा.सुजय विखे, रा.स्व.संघाचे प्रांत संपर्क प्रमुख राजाभाऊ मुळे, उपमहापौर मालन धोणे, कॉंग्रेसचे धनंजय जाधव, चंद्रकांत काळोखे यांनीही या कायद्याच्या समर्थनार्थ भाषणे केली.
सभेचे सूत्रसंचलन सचीन राउत यांनी केले. आभार रुद्रेश आंबाडे यांनी आभार मानले. यावेळी रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक डॉ.रवींद्र साताळकर, शांतीभाई चंदे, माजी खासदार दिलीप गांधी, वसंत लोढा, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सुवेंद्र गांधी आदींसह भाजप, सेनाचे नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.