बेलसर (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला असून प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकरी वर्गांकडून आता वेगवेगळ्या पद्धतीने शेती, जनावरांसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी आपल्या विहिरीतील गाळ काढून पाणी पातळी वाढवण्याचे तसेच खोल खोल बोअर घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कसेही करुन शेती व जनावरे जगविणे हाच पर्याय शेतकर्यांसमोर आहे.
पुरंदर तालुक्यातील बेलसर परिसरात जेसीबी, पोकलँड तसेच क्रेनच्या सहाय्याने विहिरीतील गाळ काढला जात आहे. 50 ते 60 फूट खोल विहीर असल्यास त्या विहिराचा गाळ पोकलँडद्वारे काढला जात आहे.तर त्यापेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींचा गाळ क्रेन (यारी) द्वारे काढला जात आहे. पूर्वीच्या काळात हे काम सर्व शेतकरी मिळुन करीत असत; परंतु सध्या हे काम बाहेरील कामगार घेवुन करावे लागत आहे.
पुरंदरमधील दुष्काळामुळे जमिनीची पाणी पातळी अत्यंत खाली गेल्यामुळे आता गाळ काढून येईल ते पाणी वापरून जनावरे तसेच शेती जगवण्याचे मोठे आव्हान शेतकर्यांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे आता मिळेल त्या परिस्थितीत शेतकरी पशुधन व शेती वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
पुरंदर तालुक्यात कर्माळा (जि. सोलापुर) येथून आलेल्या क्रेन चालक व मजुरांकडून प्रतिफूट 4 हजार 500 रुपयांनी शेतकरी गाळ काढून घेत आहेत. तर पोकलँड आणि जेसीबीद्वारे विहिरीतील गाळ काढून पाणीसाठा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे फोकलँडसाठी प्रति तास 4 हजार 500 रुपये शेतकर्यांना मोजावे लागत आहेत, – संजय जगताप, शेतकरी, बेलसर
महिला मजुरांचा सहभाग
प्रामुख्याने या क्रेन वर महिला मजुर काम करताना दिसत आहेत त्यामध्ये क्रेन चालविणे, गाळ खाली करणे तर विहिरीत उतरुन डींबरे भरुन देण्या पर्यंतची कामे महिला करीत आहेत.
बळीराजाचा शेवटचा प्रयत्न
दुष्काळामुळे पाणी पातळी खाली गेल्यामुळे विहीरी, बोअर वेल तसेच इतर पाणीसाठे आटले आहेत. तर विहिरीतील गाळ काढुन थोडे फार पाणी वाढेल या आशेने शेतकरी शेवटचा प्रयत्न करीत आहेत. .