वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यात यावर्षी अतिअल्प प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थितीत निर्माण झाली आहे. डोंगर परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोतांना यावर्षी थोड्याच प्रमाणात पाणी उपलब्ध होते. नैसर्गिक जलस्त्रोत सर्व आटले आहेत. पावसाळ्यापासूनच टँकरने कृत्रिम पाणवठे भरण्यात येत आहेत.
मागील काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे वन्यप्राणी, पिण्याच्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये दिवसाही दिसू लागले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणचे कृत्रिम पाणवठे आटत असून अनेक ठिकाणी तयार केलेले कृत्रिम पाणवठ्यात पाणी भरून ठेवणे गरजेचे असल्याने वनविभागाकडून हे कृत्रिम पाणवठे भरण्याचे काम टँकरच्या उपलब्धतेनुसार सुरू आहे.
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. चारा व पाण्यासाठी आजूबाजूच्या लोकवस्तीत दिवसाही हरणांचे कळप निदर्शनास येत आहेत. या डोंगरा परिसरात असलेले लांडगे, चारा-पाण्याच्या शोधात, मानवी वस्तीकडे येत असून अनेकवेळा शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर तसेच घरासमोर गोठ्यातील शेळी-मेंढ्या वरती हल्ला करीत होते.
अन्नपाण्यासाठी पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग व पुणे-मिरज रेल्वे मार्गओलांडून ये-जा करताना वन्यजीवांचे अपघात झाल्याच्या अनेक घटना मागील काही वर्षांत घडल्या आहेत. यामध्ये अनेक वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. वनविभागाच्या माध्यमातून कृत्रिम पाणवठ्यात पाण्याची सोय करण्यात आली असली तरी वाढत्या उष्णतेने चारा उपलब्ध नसल्याने वन्यजीव मानवी वस्तीत, शेतातील पिकांत फिरू लागले आहेत. अन्न-पाणी-सावली उपलब्ध झाल्यास वन्यजीव मानवी वस्तीत येण्याचे थांबतील, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
सध्या दिवसेंदिवस उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीवांसाठी पाण्याची गरज लक्षात घेऊन वाल्हे येथील भवानीमाता डोंगर परिसरामधील सहा कृत्रिम पाणवठे व गुळूंचे येथील परिसरातील 1, राख 1, पिंपरे खुर्द 1 कृत्रिम पाणवठे असून, वनविभागाच्या वतीने पाणवठ्यामध्ये मागील काही महिन्यांपासून, टँकर च्या माध्यमातून पाणी सोडण्यात येत आहे. – विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, सासवड