इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये बिगर मुस्लिम समाजातील मुलींचे अपहरण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याच्या घटनांचे प्रमाण लक्षणीयरितीने वाढले आहे. दरवर्षी देशभरात किमान 1 हजार मुलींचे अपहरण आणि बळजबरीने धर्मांतर होत आहे.
करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात ही कुप्रथा अधिक वाढली असल्याचे मानवाधिकार कार्यकर्त्यांचे निरीक्षण आहे.
शाळकरी मुली शाळेतून घरच्या वाटेवर असताना वाटेतील टोळक्याकडून त्यांचे अपहरण होण्याची कायम भीती असते. याची दखल अमेरिकेच्या विदेश मंत्रालयानेही अलिकडे घेतली असून “युएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडम’च्या निरीक्षणाच्या आधारे पाकिस्तानात धार्मिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत असल्याचे जाहीर केले होते.
हिंदू, शीख, ख्रिश्चन समाजाच्या अल्पवयीन मुलींचे अपहरण, बळजबरीने धर्मांतर आणि मुस्लिम तरुणांशी निकाह लावून देण्याच्या घटनांच्या आधारे हे निरीक्षण नोंदवले आहे. अनेकवेळेस अपहरण झालेल्या महिला या निकाह लावून दिलेल्या मुस्लिम युवकांपेक्षा वयाने खूपच लहान असतात. एकदा धर्मांतर झालेल्या मुलींचे लगेचच निकाह लावून दिले जातात.
बहुतेक हिंदू मुलींचे अपहरण सिंध प्रांताच्या दक्षिणेकडील भागात झाले आहे. याशिवाय कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मुलींना मोठ्या जमीन मालकांकडून अशा लग्नासाठी भाग पाडले जाण्याची उदाहरणेही अधिक प्रमाणात आहेत, असे पाकिस्तानमधील मानवी हक्क आयोगाने म्हटले आहे.
अशा मुलींच्या धर्मांतरासाठी चक्क माफिया सक्रिय असलेल्याचे बोलले जाते. पाकिस्तानातील कट्टरवादी धर्मगुरू अशा निकाहना पवित्र संबोधतात. तर न्यायपालिकेकडून कट्टरवादी संघटनांना कायदेशीर संरक्षणही दिले जाते.
जे अशा बळजबरीच्या धर्मांतराला विरोध करतात त्यांना ईशनिंदेच्या आरोपांना सामोरे जावे लागते आणि भ्रष्ट पोलीस यंत्रणेकडून अशा प्रकरणांचा तपासही होत नसल्यामुळे धर्मांतराच्या या गुन्ह्यांना रोखले जाऊ शकत नाही. पाकिस्तानच्या 22 कोटी लोकसंख्येमध्ये 3.6 टक्के अल्पसंख्यांना अशा धार्मिक असहिष्णूतेला सामोरे जावे लागते.