imtiaz jalil मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या असून त्यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी राज्य सरकारने या अधिसूचनेवर येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या हरकती आणि सूचना आल्यानंतर अध्यादेशासाठी मसुदा तयार करण्यात येणार आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते याच मुद्द्यांवरून छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लीम समुदायाला या आंदोलनातून शिकण्याचा सल्ला दिला आहे.
इम्तियाज जलील यांनी मुस्लीम समुदायाला सल्ला दिला की,’एका छोट्याशा गावातील एक सामान्य माणूस मनोज जरांगे खूप प्रामाणिक आणि निष्ठावंत आहे. मनोज जरांगे यांच्यामागे लाखोंच्या संख्येने लोक जेव्हा उभे राहतात तेव्हा एक संदेश जातो की आता लोकांचा राजकीय नेत्यांवरचा, पुढाऱ्यांवरचा विश्वास उडाला’
ते पुढे म्हणाले,’मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे पाहिलं की, मला एका गोष्टीची खंत वाटते की, आमचे लोक (मुस्लीम समुदाय) असे एकत्र येत नाहीत. मला वाटतं की, आमच्या समाजातील लोकांनीही त्यांच्यातले राजकीय मतभेद विसरून एकत्र यावं. आपसातले वाद मिटवून एकत्र आलो तर आमच्या अनेक मागण्या आम्ही पूर्ण करू शकतो. सर्वच समाजांनी मनोज जरांगेंकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रामुख्याने मुस्लीम समाजाने त्यांच्याकडून धडा घ्यायला हवा.’असेही ते म्हणाले आहे.