नवी दिल्ली – देशातील कोरोना विषाणू संकट लक्षात घेता निवडणूक आयोगातर्फे आज बिहार विधानसभा निवडणुकांबाबत महत्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. बिहार येथील विधानसभा निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पार पडतील असा अंदाज वर्तवला जातोय. अशातच निवडणूक आयोगातर्फे आज राज्यातील ६५ वर्षांवरील व्यक्तींना टपालाद्वारे मतदान करता येईल अशी महत्वपूर्ण घोषणा केली.
याखेरीज कोरोना विषाणूची बाधा झालेले, कोरोना सदृश्य लक्षणं असणारे, गंभीर आजार असणारे व गर्भवती महिला यांना देखील टपालाद्वारे मतदान करता येईल अशी माहिती निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली.
तत्पूर्वी, टपालाद्वारे मतदान करण्याची मुभा केवळ ८० वर्षांवरील नागरिक व निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येत असे. मात्र यंदा देशभरामध्ये कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले असून या विषाणूला अटकाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कमीतकमी गर्दी होईल असे निर्णय घेण्यात येत आहेत.
देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे देखील वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला व हृदयरोग, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्या रुग्णांना बाहेर न पडता घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. आता निवडणूक आयोगानेही या वर्गातील मतदारांना घरून मतदान करण्याचा अधिकार दिल्याने या निर्णयाचे स्वागत होतंय.