लखनौ – हाथरस आणि बलरामपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनांचा संदर्भ देऊन बसपच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरून योगी आदित्यनाथ यांना हटवावे किंवा त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
योगी महिलेच्या पोटी जन्माला आले. त्यांनी इतरांच्या मुली-बहिणींबाबत आपलेपण ठेवायला हवे. त्यांचे रक्षण करता येत नसेल तर योगींनी राजीनामा द्यावा. त्यांच्या जागी सक्षम नेत्याला मुख्यमंत्री बनवायला हवे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला ते जमणार नसेल तर उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी, असे मायावती यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशचा कारभार सांभाळण्याऐवजी योगींनी त्यांच्या गोरखपूर मठातच बसावे. योगींना ते पसंत नसेल तर त्यांच्यावर अयोध्येतील राममंदिर उभारणीची जबाबदारी सोपवली जावी, अशी शाब्दिक टोलेबाजीही मायावतींनी केली.