मुंबई – हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेले खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ज्या पद्धतीने रोखण्यात आले, धक्काबुक्की झाली आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ते पाहता उत्तर प्रदेशात लोकशाहीचे, कायद्याचे राज्य नसल्याचे स्पष्ट झाले. उत्तर प्रदेशात जंगलराज आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
कॉंग्रेस नेत्यांसोबत आज उत्तर प्रदेशात झालेल्या गैरवर्तुणकीबद्दल ते बोलत होते. अशोक चव्हाण म्हणाले,एका तरूणीवर अत्याचार होतो, अमानुष हत्या होते. तिला वेळेवर उपचार मिळत नाहीत, पीडित कुटुंबाच्या तक्रारीची वेळेवर दखल घेतली जात नाही, शेवटी त्या मुलीचा दुर्दैवी अंत होतो आणि पोलीस प्रशासन कुटुंबाची अनुमती न घेता मध्यरात्री लपून-छपून परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार करतात. हा सगळा प्रकार अतिशय क्रूर, अमानुष आणि संवेदनशून्य आहे. या घटनेबद्दल उत्तर प्रदेश सरकारचा करावा तेवढा निषेध कमी ठरेल.
अशा परिस्थितीत पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आणि तिथे नेमके काय घडले, याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला जात असतील तर त्यात काहीही गैर नव्हते. तरीही त्यांना का अडवले गेले, याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे. तसेच या संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.