जुन्नर -खरीप हंगाम ऐन तोंडावर आला असताना खत उत्पादक कंपन्यांनी अचानक खतांच्या किंमतीत 60 टक्के दरवाढ केली आहे. ही दरवाढ तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय खते तथा रसायन खात्याचे मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गतवर्षीपासून देशात कोविडचे संकट सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे.
मागील वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पुन्हा शेतीची कामे सुरू केली असतानाच खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किंमती 60 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची परवड होणार आहे. त्यामुळे ही खतांची दरवाढ तत्काळ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी
केली आहे.
एकीकडे शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपीट, वादळं अशा अस्मानी संकटांनी शेतकरी बेजार झाला आहे.
अशा परिस्थितीत केंद्र सरकारने स्वतःहून खतांच्या किंमतीची दरवाढ रोखायला हवी होती. परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या सुख-दु:खाशी सरकारला काही घेणेदेणे नाही असे वाटते. सरकारला जाग आणण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार आहोत, असा विश्वास खा.कोल्हे यांनी व्यक्त केला.