नवी दिल्ली – टाटा टेलिसर्व्हिसेस(महाराष्ट)्र या कंपनीचे केंद्र सरकारला मोठ्या रकमेचे देणे आहे. व्होडाफोन कंपनीप्रमाणे या रकमेचे रूपांतर शेअरमध्ये करून हे शेअर केंद्र सरकारला देण्याचा निर्णय या कंपनीने घेतला आहे.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारचे टाटा टेलिसर्व्हिसेस या कंपनीतील भागभांडवल 9.5 टक्के इतके होणार आहे. या कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आम्ही सरकारला 850 कोटी रुपये देणे लागतो.
ही रक्कम देण्याऐवजी त्याचे रूपांतर शेअरमध्ये करून हे शेअर सरकारला देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या संदर्भातील माहिती कंपनी लवकरच दूरसंचार विभागाला देणार आहे. या क्षेत्रावरील कर्जाचा बोजा वाढल्यानंतर सरकारला देणे असलेल्या रकमेचे रूपांतर शेअरमध्ये करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने या अगोदर या कंपन्यांना दिला होता.
एअरटेल या मोबाईल क्षेत्रातील कंपनीने मात्र हा पर्याय न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस या कंपनीने जरी सरकारकडे भांडवल दिले तरी या कंपनीवर कंपनीच्या सध्याच्या प्रवर्तकाचे नियंत्रण राहण्याची शक्यता आहे. या कंपन्यांच्या निर्णयावर केंद्र सरकारने अजून तरी प्रतिक्रिया दिलेली नाही.