कोलकाता – देशभरात करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक प्रचार करण्यात व्यस्त होते. त्यामुळे या राज्यांमध्ये करोना रुग्णवाढीकडे आणि करोना नियम पाळण्याकडे फारसं लक्ष देण्यात आलं नाही. आता त्याचे परिणाम समोर येत असून पश्चिम बंगालमध्ये करोना मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस तसेच इतर डावे पक्ष प्रचारासाठी सभा घेत असून रॅली काढत आहेत. हजारो लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सभांमध्ये करोना नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे. या कालावधीत बंगालमध्ये करोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सोमवारी राज्यात 4511 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या एका दिवसात नोंदवली गेलेली राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मृत्यूदर 1.7 झाला आहे. हा दर महाराष्ट्राइतका आहे.
मागील सात दिवसांपासून बंगालमध्ये दररोज 3,040 हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. बिहारमध्ये हा आकडा 2,122 तर झारखंडमध्ये 1,734 आणि ओडिसामध्ये 981 आहे. तर आसाममध्ये नव्या रुग्णांची संख्या 234 इतकी आहे. सर्वाधिक रुग्णसंख्येच्या बाबतीतही बंगाल देशात सातव्या क्रमांकावर आहे.