मुंबई – राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून बैठकांचं सत्र सुरु आहे. राज्य शासनाकडून आज गुढी पाडव्याच्या दिवशीच मोठा निर्णय जाहीर होण्याची चिन्ह आहेत. अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
‘नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, लाॅकडाऊनसंदर्भात शासनाकडून आज नवी एसओपी लागू करण्यात येणार आहे. मागील लाॅकडाऊनच्या वेळी अचानकच काही निर्णय घेतले गेल्यामुळे काही समस्या निर्माण होत्या. त्यावेळी करोनापेक्षा परिस्थितीचा अधिक त्रास नागरिकांना झाला होता. त्यामुळे त्या चुका टाळण्याबाबतही यंत्रणांमध्ये चर्चा झाली आहे,’ अशी माहिती शेख यांनी दिली. तसेच आता अधिक वेळ न दवडता अंतिम निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
करोनाची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊन हाच एक पर्याय शिल्लक असल्याचे अनेकांचे मत आहे. याविषयी कोविड टास्क फोर्सनेही 15 दिवसांचा लाॅकडाऊन लागू करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही सर्वांनी लाॅकडाऊन लागू करण्यास संमती दर्शवली आहे. त्यामुळे आता लाॅकडाऊन निश्चित असून त्याबाबता निर्णय आज होतो की 14 तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर होईल हे पाहणे महत्वाचे आहे.