मुंबई: गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने अखेर मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला.
…अखेर मुंबई विमानतळ अदानी समूहाच्या ताब्यात!
फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलय …
विमानतळ मुंबईमध्येच आहे ….
आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल…— Nitin Sardesai (@1nitinsardesai) July 20, 2021
या निर्णयामुळे नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचे कामही अदानी समूहाकडे हस्तांतरीत होणार असल्याने अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
नवी मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाला मिळाल्यानंतर माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट केलं आहे ते म्हणाले की,’फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलय … विमानतळ मुंबईमध्येच आहे …. आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल…’ असं म्हणत नितीन सरदेसाई यांनी इशारा दिला आहे.
दरम्यान, देशातील चार प्रमुख विमानतळांचा कारभार अदानी समूहाच्या हातात गेला आहे. यापूर्वी लखनऊ, मंगळुरू आणि अहमदाबाद विमानतळाचे नियंत्रण अदानी समूहाच्या हातात आले होते. त्यानंतर आता मुंबई हे अदानी समूहाच्या अखत्यारित असलेले चौथे विमानतळ आहे. यानंतर जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम ही विमानतळेही अदानी समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यातच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे बोलले जात आहे.
ही सर्व विमानतळे पुढील 50 वर्षे अदानी समूहाच्या ताब्यात असतील. या काळात या विमानतळांचा विकास, प्रशासकीय कामकाज आणि देखभाल अदानी समूहाकडून करण्यात येईल. अदानी समूहाकडून देशातील अधिकाअधिक विमानतळांचा कारभार हाती घेण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.