इंदोर – पालघरमध्ये १६ एप्रिल २०२० ला साधूंची आणि चालकाची एका अफवेमुळे जमावाकडून हत्या (मॉब लिंचिंग) करण्यात आली. त्याचीच पुनरावृत्ती मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात झाली आहे.
धार जिल्ह्यात दोन साधूंना जमावाकडून (मॉब लिंचिंग) बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनुसार, दोन साधू मध्य प्रदेशातील इंदोरच्या दिशेने प्रवास करत होते. यादरम्यान त्यांनी धन्नड गावातील रस्त्याला थांबून, रस्त्यावर उपस्थित लहान मुलांना इंदोरला जाण्याच्या मार्ग विचारला असता मुले साधूंना घाबरून तेथून पाळली.
यानंतर काही वेळात तेथे जमावा आला आणि साधूंबाबत गैरसमज करत त्यांना मारहाण केली. तेथील उपस्थित जमावाने साधू लहान मुलांचे अपहरणकर्ते असल्याचा गैरसमज करून घेतला. मारहाण केल्यानंतर जमावाकडून या साधूंना स्थानिक पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
दरम्यान, साधूंना मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील या घटनेने महाराष्ट्रातील पालघर घटनेची आठवण करुन दिली आहे. १६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात हे हत्याकांड घडले होते. अंत्यसंस्कारासाठी गुजरातला निघालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहन चालकास चोर असल्याचे समजत जमावाने त्यांचा बळी घेतला होता. पालघरमधील साधूंच्या झुंडबळीप्रकरणी सीआयडीने १२६ आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. यामधील ८९ जणांना नंतर जामीन देण्यात आला.