पंढरपूर – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विठ्ठल हे वारकरी सांप्रदायाचे आराध्य दैवत आहे. श्री विठ्ठलाची पायी वारी हा वारकऱ्यांचा धर्म आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून लाखो वारकरी संतांच्या पालखी सोहळ्यात पायी चालत येतात. त्यांच्या स्वागतासाठी लाखोंची उधळण करणारे लोकप्रतिनिधी वारकऱ्यांना सोयी सुविधा देताना मात्र उदासीन असतात. या सोहळ्यांना सोयी सुविधा देता येत नसतील तर स्वागताचा फार्स ही तरी कशाला? असा संतप्त सवाल दिंडी समाजाच्या बैठकीत व्यक्त करीत नाराजी जाहीर करण्यात आली.
यावर्षी 29 जूनला आषाढी एकादशी पंढरपूरची यात्रा आहे. त्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे अष्टमीला म्हणजेच 11 जूनला तीर्थक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सप्तमीला म्हणजे 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
आषाढी वारी २०२३ च्या नियोजन पूर्व तयारी साठी पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालखी मार्गावरील अडीअडचणी बाबत विचार विनिमय करण्यास श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाची बैठक पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर माऊली मठात झाली. या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई , विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील , व्यवस्थापक माऊली वीर, राणू महाराज वासकर , नामदेव महाराज वासकर, प्रभू महाराज वासकर, ज्ञानेश्वर जळगावकर, सचिव मारुती कोकाटे, एकनाथ हांडे, भागवत चौरे, भाऊसाहेब फुरसुंगीकर, राजाभाऊ थोरात, ज्ञानेश्वर गुळुंजकर, अजित मधवे, श्रीकांत टेंबुकर, दिनकर वांजळे, बाळासाहेब वांजळे, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, तुकाराम माने आदींसह वारकरी, फडकरी दिंडी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर बैठकीचे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी शासन अनेक योजना पुण्याच्या मिटींगमध्ये जाहीर करते. मात्र एकही पूर्ण करीत नाही. मंत्री, आमदार, गावोगावचे लोकप्रतिनिधी सोहळ्याच्या स्वागतासाठी येतात. सोहळ्यात काही पावले चालण्याचा फार्स करतात पण वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा देत नाहीत ही खरी शोकांतिका आहे . जेजुरी ते निरा पालखी मार्ग अपुरा आहे. वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर येथे गैरसोय होते. याकडे शासन लक्ष देत नाही. पालखी तळ, रिंगणाच्या जागा, विसावे आदी ठिकाणी जागा वाढवून मागितली तरीही शासन, लोकप्रतिनिधी सहकार्य करीत नाहीत. लोकप्रतिनिधीना सोयी सुविधा देता येत नसतील तर त्यांनी स्वागताचा फार्स कशाला करावा ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पालखी मार्गावर धावा, भारुड, रिंगण, पालखी विसावे याचे दिशा दर्शक, नामफलक लावावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली .
राज्यातून लाखो वारकऱ्यां समवेत संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत निवृत्तीनाथ , संत एकनाथ , संत सोपानदेव , संत नामदेव , संत मुक्ताबाई या मानाच्या सात पालख्या शेकडो किलोमीटरची पायपीट करीत पंढरपूरला येतात . त्यांच्या समन्वयासाठी शासनाने सोहळ्याची माहिती असणारा एक जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याची गरज आहे. मानाच्या सात पालख्यांचे पालखी सोहळा प्रमुख, प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक पत्रकार यांची एक समन्वय समिती स्थापन करण्याची मागणी ढगे पाटील यांनी यावेळी केली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व सासवड येथील कऱ्हा नदी वरील पुलाचे काम राज्य व केंद्र शासना कडे सातत्याने पाठपुरावा करुन पूर्ण करुन घेतल्या बद्दल दिंडी समाजाचे सचिव मारुती कोकाटे व संत नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) अशी सुमारे 2500 किलो मीटरची जगातील पहिली सायकल यात्रा काढल्या बद्दल पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांचा सन्मान संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व वारकरी फडकरी दिंडी समाज यांच्या वतीने यावेळी करण्यात आला. या बैठकीत वाल्हे व दौंडज येथील परतीच्या प्रवासातील मुक्काम जाहीर करण्यात आला. या प्रसंगी दौंडजचे विक्रम फाळके, सरपंच सीमा भुजबळ, वाल्हे सरपंच अमोल खवले, सदस्य हनुमंत पवार, सचिन लंबाते, किरण कुमठेकर, अतुल नाझरेकर आदी उपस्थित होते.