कोल्हापूर – सध्या वाईनची सुपरमार्केटमध्ये विक्री करण्याची परवानगी दिल्यावरून वाद सुरू आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. मी स्वतः वाईन पिण्याचे समर्थन करणार नाही. मात्र डॉक्टरांनी सुद्धा सांगितले आहे की कोणतीही गोष्ट प्रमाणात असेल तर ती योग्य आहे. वाईन लिमिट मध्ये घेतल्यास अँटी ऑक्सिडंट आहे. कोल्हापूरात एका खासगी रुग्णालयाच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, की वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय दारूला प्रोत्साहन देण्यासाठी नाही. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. यावेळी मास्क मुक्तीबाबतसुद्ध निर्णय घेणार आहे. ज्या राष्ट्रांनी मास्क मुक्त केले आहे, त्यांनी नेमके काय शास्त्र वापरले याचा अभ्यास करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोना काळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तिजोरी रिकामी केली
कोरोना काळात प्रत्येक राज्यांनी कार्यक्षमतेने काम केले आहे. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी तर या काळात कोरोना उपाययोजनांसाठी तिजोरी रिकामी केली आहे. कोरोना रुग्णांसाठी त्यांनी प्राधान्य दिले. अनेक चांगल्या संस्थांनी राज्याचे कौतुक केले आहे. आम्ही आमच्या परीने जमेल तेवढे काम केले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना महाराष्ट्र सरकारने कोरोना पसरविल्याचे विधान केले होते .
मास्क मुक्तीबाबत अभ्यास करणार –
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मास्क मुक्तीबाबत विचारले असता ते म्हणाले अद्याप मास्कमुक्त महाराष्ट्र करण्याबाबत आमचा निर्णय झालेला नाही. पाश्चिमात्य देशांनी मास्क फ्री धोरण केले आहे. याबाबत केंद्राच्या आणि राज्याच्या टास्क फोर्सला तशी विचारणा करण्याबाबत चर्चा झाली आहे. आता निर्बंध वाढवण्याचे काहीही कारण नाही. उलट निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तसा विश्वास दिला आहे, असेही ते म्हणाले.