नवी दिल्ली – जगभरामध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूने भारतात देखील आपले पाय रोवले असून या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणा आता खडबडून जाग्या झाल्या आहेत. कोरोना या संसर्गजन्य रोगाचा अटकाव करता यावा यासाठी केंद्र सरकारतर्फे बुधवारपासून देशभरामध्ये २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी हा लॉक डाऊन अत्यावश्यक असला तरी यामुळं हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था मात्र बिकट झालीये.
रोजगारनिमित्ताने दुसऱ्या राज्यांमध्ये मोलमजुरी करणारे हे मजूर लॉक डाऊनमुळे हतबल झाले असून आपल्या गावी परत फिरण्याशिवाय त्यांच्याकडे आता इतर कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचं चित्र आहे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या रोजगाराच्या संधीच लॉक डाउनच्या काळात बंद झाल्याने हा कष्टकरी वर्ग आता मिळेल त्या साधनाने आपल्या घराकडे परततोय.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये देखील अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळत असून बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमधून आलेल्या कामगारांनी आता घरची वाट धरली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने या कामगारांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत.
याबाबत बोलताना, ‘लॉक डाऊन असल्याने आम्ही गेल्या दोन दिवसांपासून उपाशी आहोत. हाताला रोजगार नसल्यानं खिशात पैसा नाही. अन् अशा अवस्थेत १० रुपयांचा बिस्किटचा पुडा ३० रुपयांना मिळतोय. आम्ही इथं राहिलो तर एकतर आमचा बळी भूक घेईल किंवा कोरोना.’ अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया एका मजुराने दिली आहे.
Delhi: Migrant labourers have started leaving for their hometown in neighbouring states. A labourer says “We’re going to Badaun(UP) from Okhla. We’re hungry from 2 days. Biscuit pack which used to cost Rs 10 now costs Rs 30. We’ve no money. We’ll die either of hunger or #COVID19” pic.twitter.com/9SY2iD5Tc4
— ANI (@ANI) March 27, 2020