पुणे – करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागांत संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा “अत्यावश्यक सेवा’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ग्रामपंचायती सर्व दिवसभर नागरिकांच्या सेवेसाठी उघड्या ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
पुण्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार होऊ नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या सर्व सेवा “अत्यावश्यक सेवा’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतीमार्फत करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जनजागृती करणे, स्वच्छता व साफसफाई करणे, शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, आरोग्यविषयक सुविधा देणे, आदी अत्यावश्यक सेवेच्या जबाबदाऱ्या ग्रामपंचायतीमार्फत पार पाडल्या जातात.
यापुढे सर्व ग्रामपंचायती सर्व दिवस सुरू
ग्रामसेवक व सरपंच यांनी पूर्णवेळ ग्रामपंचायतींमध्ये हजर रहावे, गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. करोनाच्या संसर्गाबाबत आणि घ्यावयाच्या दक्षतेबाबत यापूर्वी दिलेल्या सूचनांची अंमलबजावनी होईल, याची दक्षता घ्यावी. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात करोनाग्रस्त रुग्ण अथवा करोनासदृश लक्षणे असलेली व्यक्तीसंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद करोना कक्ष येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
बॅंकांनी रोकड उपलब्ध ठेवावी
करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बॅंकांनी शाखा, एटीएम आणि गावोगावी नेमलेल्या बॅंक प्रतिनिधींकडे (बॅंक करस्पॉंडटस्) पुरेशी रोकड उपलब्ध ठेवावी, एटीएम व शाखेमध्ये सोडिअम हायपोक्लोराईड वापरून निर्जंतुकीकरण करावे, प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खातेधारकांना 5 हजारचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध करून द्यावा, बॅंक प्रतिनिधींनी सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील बॅंकांना दिले आहेत.