मुंबई : काही दिवसापूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काही पोस्टर झळकले होते. या पोस्टरमधून आमच्या हक्काची लस परदेशात का पाठवली असा सवाल करण्यात आला होता. या प्रकरणी काहींना अटकही झाली होती. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्राला आव्हान दिले आहे.
“परदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच. किती लोकांना भाजप सरकार अटक करणार आहे. लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्र सरकारची कायरता आहे,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान संपूर्ण देश एकजूट आहे. किती लोकांना अटक करताय बघूया असे आव्हानही नवाब मलिक यांनी दिले आहे.
“डाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, जितके लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस परदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्र सरकार मात्र एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे. तर काहीजण पाच कोटी लसी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लस उपलब्ध होत नाहीय तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जात आहेत,” असं नवाब मलिक म्हणाले.
“मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली अशी पोस्टर्स काही लोकांनी लावली आहेत. तर भाजपचे काही लोक लहान मुलांची लस तयारच झाली नसल्याचे बोलत आहेत. सर्व भारतीय भारतमातेची लेकरं आहेत. लस परदेशात पाठवली तर प्रश्न लोकं विचारणारच ना? परंतु केंद्र सरकार प्रश्न विचारणाऱ्या लोकांना गुन्हा दाखल करुन अटक करत आहे. संपूर्ण देश प्रश्न विचारतोय. मोदीजी, तुम्ही किती लोकांना अटक करणार?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.