नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन आणि कलम ३७० विरोधात बोलल्याने माझी सुरक्ष कमी करण्यात आली, असा आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. तसेच माझ्या जिवाला काही बरं वाईट झालं तर त्याला केंद्र सरकार जबाबदार राहिल, असे खळबळजनक वक्तव्य मलिक यांनी केले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
सत्यपाल मलिक यांनी,“आजपर्यंत जी व्यक्ती राज्यापाल म्हणून निवृत्त झाली, त्या सर्वांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, माझी सुरक्षा काढण्यात आली. माझ्या सुरक्षेत केवळ एक पीएसओ तैनात करण्यात आला आहे. तोही तीन दिवसांपासून आलेला नाही”, अशी प्रतिक्रिया सत्यपाल मलिक यांनी दिली आहे.
पुढे बोलताना त्यांनी जीवाला धोका असल्याचेही म्हटले आहे. “माझ्या जीवाला धोका आहे. कारण जेव्हा कलम ३७० रद्द करण्यात आले, तेव्हा मी जम्मू काश्मीरचा राज्यपाल होतो. तिथल्या अधिकाऱ्यांनी मला पाकिस्तानपासून धोका असल्याचे सांगितले होते. तसेच मला सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीत घर द्यावी, अशी शिफारस काश्मीरच्या सुरक्षा सल्लागार समितीने केली होती”, असे ते म्हणाले.
“मी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यालयाला पत्र लिहिले होते. मात्र, सुरक्षा कमी करण्यासंदर्भात मला मंत्रालयाकडून कोणतेही कारण सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं, तर त्याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार असेल”, अशा इशाराही त्यांनी दिला.