पुणे – महापालिका निवडणुकीसाठी दोन प्रभाग पद्धतीची मागणी कधीच केली नव्हती. आता, आम्ही तीनचा प्रभाग अंतिम केला आहे. हा निर्णय कायम राहणार आहे. तसेच, यापूर्वी एक-दोन आणि तीनचा सुद्धा प्रभाग होता. नागरिक विकासकामे पाहून मतदान करतात. त्यामुळे प्रभाग कितीचा झाला याचा काही फरक पडणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
विधानभवन येथील पत्रकार परिषदेमध्ये प्रभाग पद्धतीविषयी विचारले असता पवार यांनी
आपली भूमिका मांडली. यावेळी पवार म्हणाले की, राज्यात ज्यावेळी 1999 ते 2014 या दरम्यान आमची सत्ता होती. त्यावेळी एक, दोन आणि तीनचा प्रभाग झाले होते. तीनचा प्रभाग करायचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याविषयी सर्वांनी मते व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे. आघाडी विषयी विचारले असता पवार यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहूनच घेण्यात यावा, असे माझे मत आहे.
करोना स्थितीचा घेतला आढावा…
ससून रुग्णालयात करोनाचे नगर जिल्ह्यातले सुमारे 40 टक्के रुग्ण आहेत. उर्वरित 60 टक्के रुग्ण कोणत्या जिल्ह्यातील आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे. नगरच्या जिल्हाधिकारी याविषयी फोनवरून चर्चा केली आहे. त्यांना काही मदत हवी असेल तर ती देण्याची तयारी दर्शविली आहे. यासह पारनेर आणि संगमनेर तालुक्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण आहेत. त्यामुळे आवश्यक त्या गावात गावबंदी करा, अशा सूचना दिल्या आहेत, असे पवार यांनी सांगितले.