नवी दिल्ली – नुकताच प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय. काश्मीरमधील पंडितांच्या पलायनावर आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारावर आधारित हा सिनेमा असून यावरून राजकारण तापलं आहे. त्यातच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कान्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी सडेतोड भुमिका मांडली आहे.
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, काश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी दिल्लीत बसलेले तत्कालीन सरकार होते. तसेच पंडितांच्या पलायनास मी जबाबदार असल्याचं आढळून आलं तर मला हवं तिथं फाशी द्या, अस आव्हान त्यांनी केलं.
फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले की, काश्मिरी पंडितांनी परत यावं ही प्रत्येक काश्मिरी व्यक्तीची इच्छा आहे. 1990 मध्ये जे घडले ते षड्यंत्र होतं. त्यावेळी काश्मिरी पंडितांना हाकलण्याचा कट रचला गेला. तेव्हा जे दिल्लीत बसले होते तेच याला जबाबदार आहेत. माझे मन अजूनही काश्मिरी पंडितांसाठी व्याकूळ असल्याचं अब्दुल्ला यांनी नमूद केलं.
दरम्यान द काश्मिर फाईल्स चित्रपटासंदर्भात अब्दुल्ला म्हणाले की, हा चित्रपट मन जोडत नसून तोडण्याचं काम करतोय. चित्रपटाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या आगीला आपण रोखलं नाही तर ही आग संपूर्ण देश जाळून टाकेल. त्यामुळे मी देशाच्या पंतप्रधानांना विनंती करतो की, त्यांनी अशा गोष्टी करू नये, जेणेकरून देश हिटलरच्या काळातील जर्मनीसारखा दिसेल.