नवी दिल्ली – दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात सीबीआयने उद्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. त्यावर केजरीवाल यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी जर भ्रष्ट असेन तर संपूर्ण जगात कोणीच प्रामाणिक असू शकत नाही.
आज पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले की, भाजपच्या काही नेत्यांनी आपल्या अटकेची मागणी केली आहे. त्यानुसार सीबीआय या तपास यंत्रणेला माझ्या अटकेचे आदेश देण्यात आले असावेत. केजरीवालांना रविवारी सीबीआयने चौकशीसाठी हजर राहण्याची सुचना केली आहे. त्यानुसार आपण सकाळी अकरा वाजता त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत केजरीवालांनी मोदींवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले.
जो माणूस भ्रष्टाचारात नखशिखांत बुडाला आहे त्या माणसासाठी भ्रष्टाचार हा विषय इतका महत्त्वाचा कसा काय झाला, असा सवालही त्यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आरोपांची उदाहरणेही त्यांनी दिली. मोदी हेच सर्वात भ्रष्ट नेते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्षाने लोकांना राजकारण्यांपासून काही आशेचा किरण दिसू शकतो हे दाखवून दिले आहे, म्हणून आमच्या पक्षाच्या नेत्यांवर आणि आमदारांवर असे सतत हल्ले होत असतात. स्वतंत्र भारतात कोणत्याही राजकीय पक्षावर केंद्र सरकारकडून आमच्याइतके अत्याचार झाले नसतील, असे ते म्हणाले.
भाजपच्या गुजरातमधील तीस वर्षांच्या राजवटीत एकाही शाळेची स्थिती सुधारली नाही. पण आम्ही दिल्लीतील सर्व सरकारी शाळांमध्ये गेल्या पाच वर्षांत आमूलाग्र बदल केला आहे. हे त्यांना पहावत नाही, म्हणनू आम्हाला दाबून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. मध्यंतरी मोदींच्या गुजरात दौऱ्यासाठी एक नकली व तात्पुरती क्लासरूम रंगरंगोटी करून दाखवली गेली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आपण दिल्ली विधानसभेतील एका भाषणात पंतप्रधान मोदींच्या भ्रष्टाचाराचे संपूर्ण वाभाडे काढले होते. त्याचवेळी आमच्या पक्षाचे नेते संजयसिंह यांचा मला फोन आला होता की, आता सिसोदियानंतर तुमचा नंबर लागणार आहे. आपण जे उत्पादन शुल्क धोरण राबवणार होतो त्यातून भ्रष्टाचार संपणार होता व त्यातून सरकारचा महसूलही वाढणार होता, असे ते म्हणाले.
हे धोरण याआधीच रद्द करण्यात आले आहे. परंतु तरीही अनेकांना यात अटक करण्यात आली आणि त्यांचा तुरुंगात छळ करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या नावाने कोणालाही उचलून तुरुंगात टाकले जात आहे आणि त्यांचा छळ केला जात आहे. हे काय चालले आहे, असा सवाल त्यांनी मोदींना उद्देशून केला.
सीबीआय आणि ईडीने आमच्या संबंधात सतत खोटे दावे कोर्टात केले आहेत. सिसोदियांनी पुरावे नष्ट करण्यासाठी चौदा फोन फोडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यापैकी चार फोन आम्ही जप्त केले आहेत, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. परंतु हे सर्व फोन ऍक्टिव्ह असून, त्यांचा वापर आप पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असल्याचा खुलासाही त्यांनी केला. या घोटाळ्यात शंभर कोटी रुपयांची लाच घेतली गेली आहे, असा आरोप केला जात आहे. पण हे पैसे कोठे आहेत, असा सवाल त्यांनी तपास यंत्रणांना केला. या प्रकरणात चारशेपेक्षा अधिक छापे घातले गेले आहेत, मग हे पैसे का सापडले नाहीत किंवा त्यांचा कोणताच माग का लागला नाही, असा सवालही त्यांनी केला.
सीबीआय, ईडीच्या विरोधात दावा ठोकणार
केजरीवाल म्हणाले की, आमच्या विरोधात खोट्या केसेस केल्याने आम्ही सीबीआय आणि ईडीच्या विरोधात दावा करणार आहोत. त्यांनी आमच्या विरोधात खोटे पुरावे सादर केले आहेत. त्यालाही आम्ही आव्हान देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. परवा आप पक्षाचे खासदार संजयसिंह यांनी आपल्या विरोधात खोटी केस केल्याबद्दल आपणही ईडी आणि सीबीआयच्या विरोधात बदनामीचा दावा ठोकणार आहोत, असे म्हटले आहे.