मुंबई – मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. तुमचा मुलगा खासदार बनू शकतो. मग, माझ्या मुलाने (आदित्य) काहीच करू नये का, असा थेट सवाल त्यांनी शिंदे यांना उद्देशून विचारला.
शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्या बंडासाठी विविध कारणे सांगितली जात आहेत. आदित्य यांचा कथित हस्तक्षेप हेही त्यापैकी एक कारण मानले जाते. त्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधताना ठाकरे यांनी आदित्य यांची पाठराखण केली. आदित्य यांची राजकीय उंची वाढू नये का, अशा आशयाचा सवाल त्यांनी केला. शिवसेनेसाठी बंड नवे नाही. याआधी बंडखोरांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विठ्ठल असायचे आणि मी बडवा असायचो. आता त्यांच्यासाठी मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे, असे ते म्हणाले.
पुन्हा भाजपशी युती करावी अशी शिवसेनेच्या आमदारांची इच्छा असल्याचे शिंदे यांनी मला काही काळापूर्वी सांगितले होते. ते कुठल्या प्रकारचे शिवसैनिक आहेत? वापरा आणि फेकून द्या या भाजपच्या धोरणाचा संताप त्यांना वाटत नाही का? बाळासाहेबांच्या निधनानंतर शिंदे यांना दोन वेळा मंत्री बनवले. साधारणपणे मुख्यमंत्र्यांकडे असणारी खाती त्यांच्याकडे सोपवली. शिवसेना आणि ठाकरेंचे नाव न वापरता राजकारणात टिकून दाखवा, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.
आपण ज्यांना मोठं केलं; त्यांची स्वप्नं आता मोठी झाली. आता ती आपण पूर्ण करू शकत नाही. महत्वाकांक्षा असावी. पण, ज्यानं दिलं त्यालाच खावं अशी राक्षसी महत्वाकांक्षा नसावी. आतापर्यंत जे भाजपसमवेत गेले ते सर्व संपले आहेत. कितीही सोडून जाऊद्यात. शिवसेनेला काही होणार नाही. आपल्याबरोबर कुणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा, असे आवाहन त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते भावूकही होताना दिसले. याआधी त्यांनी बंड संपवण्याच्या उद्देशातून बंडखोरांना भावनिक आवाहन केले होते. मात्र, यावेळी त्यांनी बंडखोरांना थेट आव्हान दिले आहे.