गुवाहाटी – आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत असून सिलचर पाण्याखाली गेले आहे. या पुरात आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 108 वर पोहचला आहे. यात 30 जिल्ह्यांतील 45.34 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे, तर 32 जिल्ह्यांतील पूरग्रस्तांची संख्या 54.5 लाख होती.
आसाममधील पुरस्थिती पाहता राज्याचे मुख्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांनी पुरग्रस्त जिल्ह्यांचा पाहणी दौरा केला. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बुलेटिननुसार, पुरामुळे बाधित लोकांची संख्या कमी झाली आहे.
मे महिन्याच्या मध्यापासून पुरामुळे आतापर्यत 108 लोकांचा मृत्यू झाला आहे. कचर आणि बारपेटा येथे प्रत्येकी दोन, बजली, धुबरी आणि तामुलपूर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्या आणि त्यांच्या उपनद्यांना बहुतांश बाधित जिल्ह्यांमध्ये गळती लागली आहे. मात्र काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरले आहे.
हवाई पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बराक खोऱ्यातील पूरस्थितीचा आढावा घेत विविध घोषणा केल्या आहेत. पूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सिलचरला आणखी तुकड्या पाठवण्यात येणार आहेत. सरमा यांनी कचार जिल्ह्यातील सिलचर येथे आढावा बैठकीनंतर उपायुक्त कार्यालयाबाहेर पत्रकारांना सांगितले की, एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, इतर एजन्सी बचाव कार्य करत आहेत. मात्र अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी आणखी फौजफाटा येणार आहे.
बारपेटा सर्वाधिक प्रभावित
बराक व्हॅली, कचार, करीमगंज आणि हैलाकांडी हे तीन जिल्हे भीषण पूरग्रस्त आहेत. बराक आणि कुशियारा नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत असून, सहा लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की बारपेटा येथील परिस्थिती सर्वात वाईट आहे. या ठिकाणी 10,32,561 लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. कामरूपमध्ये 4,29,166, नागावमध्ये 4,29,166, धुबरीमध्ये 3,99,945 लोक बाधित झाले आहेत. दरम्यान, पुरामुळे राज्यातील शाळांमध्ये एक आठवडा अगोदर उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.