परिसरात अस्वच्छता ः नागरिक, प्रवासी त्रस्त
निमसाखर -निरवांगी (ता. इंदापूर) येथील बसस्थानक व समोरील परिसरात अस्वच्छता पसरली आहे. यामुळे परिसरामध्ये येणारे प्रवासी, नागरिक व व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
निरवांगी हे गाव साडेतीन हजार लोकसंख्येचे आहे. राजकारणात दबदबा असलेलं, गावाजवळ नीरा नदी तर परिसरातील शेतीसाठी निरा डाव्या कालव्यातूनही या परिसराला आवर्तन मिळते. यामुळे काही प्रमाणात आर्थिक सुबकत्ता वाढली आहे. बीकेबीएन (बारामती – कळंब – बावडा – नरसिंहपूर) हा रस्ता वर्दळीचा असल्याने नीरवांगी चौकात नेहमीच गर्दी असते.
या परिसरामध्ये व्यवसायिक शॉपीग सेंटर, प्राथमिक शाळा, चौकात ग्रामपंचायत कार्यालय, बसस्थानक मागील बाजूस आठवडा बाजार भरतो. तर चौकातून सराफवाडी रस्त्यावर हायस्कूल आहे. त्यामुळे चौक परिसरात नेहमीच रेलचेल असल्याचे पाहायला मिळते.
परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी, प्रवासी बस स्थानक परिसरातून जा – ये करत असतात. त्यामुळे इथल्या अस्वच्छतेबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी वाढत आहेत. नीरवांगी बसस्थानक परिसरात बससाठी उभे राहणेही मुश्किल होत आहे. या अस्वच्छतेमुळे प्रवाशांची कुचंबना होत असते. शिवाय या भागातील बसस्थानक भिंतीवरती अनेक भिती पत्रके, वेगवेगळ्या जाहिराती चिटकून एक प्रकारे बसस्थानकाचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे.
ज्या प्रमाणे घराची कळा अंगणावरुन कळते, त्याच प्रमाणे बसस्थानकाच्या अवस्थेवरुन गावात किती स्वच्छ असेल अशी चर्चा गावात आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने वसस्थानक व परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
निरवांगी बसस्थानक परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्याबाबत लवकरच संबंधित कर्मचाऱ्यांना सुचना करून परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. या बरोबरच बसस्थानक भिंतीवर जे भित्तीपत्रक चिकटवून विद्रुपीकरण केले आहे, त्या भिंतींना लवकरच कलर देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– जी. एस. बोराटे, ग्रामसेवक निरवांगी.