सोमाटणे – मोबाइल कंपन्यांच्या बंद पडलेल्या टॉवर्समुळे मोबाइलवरुन केलेला कॉल जोडला जात नाही, तसेच इंटरनेटला वेगही हवा तसा मिळत नाही. त्यामुळे लोणी भापकर येथील मोबाइल ग्राहकांनाच मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहरात काही वर्षांपूर्वी आयडिया कंपनीचा टॉवर उभारण्यात आला होता. त्यामुळे येथे बहुतांश नागरिक आयडियाशी जोडले गेले आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून आयडिया कंपनीच्या ग्राहकांना रेंज मिळत नसल्याने केलेले कॉल वाया जात आहेत.
फोनच लागत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. जर लागलाच तर समोरच्याकडून प्रतिसाद मिळाला की नाही, हेच समजत नाही. फोरजी, फाईव्ह जीच्या जमान्यात आयडिया कंपनीकडून टू जीचा देखील डेटा स्पीड मिळत नसल्याचे मोबाइल धारकांकडून सांगण्यात येत असून, ते आयडियाच्या सेवेला वैतागले आहेत.