राजूर – येथील बीएसएनएल ग्राहक नेटवर्कमुळे त्रस्त झाले आहे. परिसरामध्ये बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला असून, त्यामुळे ग्राहकांनी आपल्या सीमकार्डाची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे. जग आधुनिकतेकडे झुकत असताना आदिवासी भाग मात्र नेटवर्किंग समस्येमुळे दोन पावले मागेच राहिला.
अभयारण्यामध्ये इतर कंपन्यांबरोबरच बीएसएनएल ही शासकीय कंपनीही सेवा देत आहे. त्यातच पाणलोटात असणाऱ्या अभयारण्यामध्ये फक्त बीएसएनएल या कंपनीचीच सेवा उपलब्ध आहे. त्यातच या कंपनीच्या सेवेवरच राजूर या प्रमुख बाजारपेठेत बँकिंग सेवांसह, सायबर कॅफ व इतर शासकीय सुविधा अवलंबून आहेत. बँकेतही बीएसएनएलची सेवा आहे. त्यामुळे बीएसएनएलची सेवा ठप्प झाल्यावर बँकेचीही सेवा ठप्प होते. परिणामी या बँकेमध्ये व्यवहार करण्यासाठी आलेले आदिवासी समाज बांधव यांना परत फिरावे लागते. राजूर येथे अनेक सायबर कॅफेवाल्यांनी ब्रॉडगेज नेटवर्क घेतलेले आहे. जानेवारीपासन फक्त आठ दिवस बीएसएनएल कंपनीने पूर्णवेळ सेवा पुरविली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्मही भरले गेले नाहीत. तक्रार करूनही काहीच फायदा होत नाही. त्यामुळे राजूर परिसरातील बीएसएनएलच्या ग्राहकांनी एकत्र येत सीमकार्डाची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीएसएनएलचेच बील भरणे झाले अवघड
राजूर येथील बीएसएनएलची सेवा कायम खंडित होत असल्यामुळे आदिवासी भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप करावा लागतो. पूर्ण दिवसही वाया जातो. सतत खंडित होणारे ब्रॉडबॅन्ड तसेच मोबाईल सुविधेमुळे इंटरनेटचे मासिक शुल्कदेखील भरणे शक्य होत नाही.
सुरेश भालेराव, सायबर कॅफे चालक