कॅंडी :- बीसीसीआयने भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संभाव्य खेळाडूंची नावे निश्चित केल्याचे संकेत दिले आहेत. त्यात चार महिने संघातून बाहेर असलेला यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुलची निवड करण्यात आली असून संजू सॅमनला डच्चू देण्यात आला आहे. निवड समिती लवकरच संघाची अधिकृत घोषणा करणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शनिवारी रात्री श्रीलंकेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह बैठक घेतली व त्यात 15 खेळाडूंची नावे संभाव्य संघ म्हणून निश्चित करण्यात आली आहेत.
अतिरीक्त यष्टिरक्षक म्हणून संघात इशान किशनचाही संघात समावेश करण्यात आला आहे. आशिया करंडक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान ही बैठक झाली. सॅमसनसह तिलक वर्मा व प्रसिद्ध कृष्णा यांना संघात स्थान मिळवण्यातअपयश आले असून कर्णधारपद रोहित शर्माकडेच कायम राखण्यात आले आहे.
रोहितसह विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) राहुलच्या तंदुरुस्तीबाबत प्रमाणपत्र दिल्याने त्याची निवड करण्यात आली आहे.
राहुल बेंगळुरू येथे अकादमीत नेटमध्ये सराव करत होता, त्याला आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला पाठवण्यात आले आहे. आयसीसीने विश्वकरंडक स्पर्धेसाठी 5 सप्टेंबरपूर्वी संघ निवड करण्याची सुचना सर्व सहभागी देशांच्या क्रिकेट मंडळांना केली होती. त्यासाठी निवड समिती सोमवारी संघ निवड जाहीर करणार आहे, असेही संकेत मिळत आहेत. उजव्या पायाच्या मांडीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर राहुल तब्बल 4 महिने क्रिकेटपासून दूर होता.
संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, महंमद शमी, महंमद सिराज.