मुंबई – केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करून सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका दिला आहे. या भाववाढीने गॅस सिलिंडर 1050 रुपयांवर पोहोचले आहे. यावरून “ना खाने दूँगा, ना पकाने दूँगा’ हा मोदी सरकारचा नवा नारा बनला आहे, असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगाविला.
नाना पटोले म्हणाले, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाईचा आलेख वाढतच आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भावही सामान्यांच्या हाताबाहेर गेले आहेत. तर गॅसचा भाव सातत्याने वाढवून आता तो 1050 रुपये झाला आहे.
कॉंग्रेस प्रणित युपीए सरकारच्या काळात 2014 साली हाच गॅस सिलिंडर 450 रुपयांना मिळत होता. महागाईची झळ जनतेला बसू नये म्हणून डॉ. मनमोहनसिंह सरकार सबसिडी देत होते, पण मोदी सरकारने ही सबसिडीही बंद केली. मोदींच्या कृपेने आता आपल्या जनतेला जगातील सर्वात महाग एलपीजी गॅस खरेदी करावा लागत आहे.
मोदींच्या मित्रांना “अच्छे दिन’
देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे, डॉलरच्या तुलनेत रुपया दररोज घसरत आहे. महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे. मात्र मोदी सरकार व मोदींच्या मित्रांचे “अच्छे दिन’ आले आहेत. पेट्रोल डिझेलवरील करातून आधीच 26 लाख कोटी रुपयांची लूट केली असून आता देशांतर्गत तेल उत्पादनावर अतिरिक्त लाभ कर लावून सरकारला आणखी नफा मिळणार आहे. सरकार स्वतःची तिजोरी भरून जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटत आहे, असेही पटोले म्हणाले.