मुंबई – राज्यभरातील हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात गणपतीला वाहने जायच्या तेव्हा आपण ज्याप्रकारे स्टीकर देत होतो, तसेच स्टीकर आपण वारकरी सांप्रदायांनी गाडी नंबर आणि नावाची नोंदणी करावी. तसेच ट्रोल फ्री करण्यासाठी मुख्य सचिवांना मी सूचना दिल्या आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, कोविड काळात स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू ठेवावे आणि कोविड परिस्थितीत शासनाला योग्य त्या सूचना देण्यात खंड पडू देऊ नये, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा करून त्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.