पिंपरी -महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी अजितदादांना झाल्याचे मला बघायचे आहे. ही भावना आपण सर्वांनी ठेवून त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणे, हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे विधान शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. ते चऱ्होलीतील भोसरी विधानसभा कार्यकर्ता आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. खासदार कोल्हे म्हणाले, माझ्यासाठी तुम्ही जीवाचे रान केले, पायाला भिंगरी लावून काम केले. आता मला तुमच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे.
शरद पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. पण त्यांना जर देशाच्या पंतप्रधानपदी पाहायचे असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती काय असते हे आपण त्यांना दाखवून दिली पाहिजे असे खासदार कोल्हे म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करणाऱ्या अजितदादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडसाठी कित्येक गोष्टी केल्या आहेत. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची हीच वेळ आहे. अजित पवारांच्या कुशल नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर पिंपरी-चिंचवड शहराची ओळख झाली. या नेतृत्वाला आणखी बळ देण्याची गरज असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.
“पिंपरी चिंचवडची सूत्रे हाती द्या’
शिरूरच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवारांच्या सोबत होतो. ते त्या इमारतीचा कोपरा ना कोपरा पाहात होते. मी त्यांना न्याहाळत होतो. त्यावेळी मनात विचार आला की, याच पद्धतीने अजित दादांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना इथली प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल. पुन्हा हा योग पिंपरी-चिंचवड शहरात कधी येणार? शहराचा विकास करायचा असेल तर शहराची सूत्रे पुन्हा अजितदादांच्या हातात द्या. मात्र, त्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करणे आवश्यक आहे. आगामी काळात पदाधिकाऱ्यांनी ते काम अचूक करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.