Eknath Shinde: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरूवात झाली. यावेळी मराठा आरक्षणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र सोशल मीडियावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
पटोलेंशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी लिमीटच्या बाहेर गेलं की ,आपण कार्यक्रम करतो असं विधान करताना दिसतात. ते मनोज जरांगे यांच्या बाबत बोल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरून शिंदे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात झाल्यानंतर मंत्री दीपक केसरकरांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
दीपक केसरकर म्हणाले, “नाना पटोलेंना संजय राऊतांचं काय चाललं असे विचारयचे होते, त्यावर मुख्यमंत्री योग्यवेळ आल्यावर आम्ही कार्यक्रम करू असे म्हणाले आहेत. कारण तो कार्यक्रम कधीतरी होणं आवश्यक आहे. किती वाईट बोलावं याला काही मर्यादा असतात आणि तो कार्यक्रम चोख उत्तर देऊन होऊ शकतो. पण कोणीतरी जरांगेंचा गैरसमज करून देत आहे. यामागची व्यक्ती शोधून काढली पाहिजे.”
पुढे ते म्हणाले, “आनंदाचं वातावरण महाराष्ट्रात असताना त्यात कुणीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे लोकांसाठी काही करू शकले नाहीत ते पाठीमागून अशा कुरघोड्या करत असतात. जरांगे पाटील यांनी याला बळी पडू नये. जरांगेंनी जे कष्ट घेतले त्याची जाणीव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे ते सातत्याने त्यांच्यासोबत राहिले. पण जर कुणी त्यांना खोट्या गोष्टी सांगितल्या तर त्याला जरांगेंनी बळी पडू नये”, असं आवाहन केसरकरांनी जरांगे पाटील यांना केले आहे.
व्हायरल व्हिडिओत काय आहे?
सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवन परिसरात भेट झाली. त्यावेळी एकनाथ शिंदे ‘सामाजिक कार्यकर्ता होता, तोपर्यंत सर्व ठीक होते. लिमिटच्या बाहेर गेलं की मी करेक्ट कार्यक्रम करतो ‘ असे विधान करतात.