मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमीरा लागला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी देशमुख यांच्यावर मोठी कारवाई होईल, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत. त्यातच आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देशमुखांना टोला लगावला आहे.
भातखळकर यांनी ट्विट करून अनिल देशमुखांवर टीकास्त्र सोडलं आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गायब झाले आहेत. अनिल देशमुख यांचे आता वय झाले आहे. या वयात त्यांना लपाछपीचा खेळ झेपेल, असं वाटत नाही, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील दोन घरांवर रविवारी ईडीने पुन्हा छापे घातले. अनिल देशमुख यांचे काटोल गावात एक घर असून काटोल जवळील वडिविहीरा गावात त्यांचे वडिलोपार्जित घर आहे.
ईडीने या आधी अनिल देशमुखांशी संबंधीत दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्याची किंमत 4 कोटी 20 लाख रूपये इतकी आहे. मात्र त्यांचे व्यवहार हे 2004 व 2005 सालातील आहेत त्यामुळे त्या मालमत्तांचा सचिन वाझे याने केलेल्या लाचखोरीच्या आरोपाशी कसा असा सवाल सत्ताधारी आघाडीकडून केला जात आहे.