नवी दिल्ली : करोनामुळे एकीकडे सर्वजण शहराला दूर करून आपल्या गावाला जवळ करत आहेत. त्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यामुळे कोणत्याही प्रकारची सोय सध्या सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. परंतु, यासर्वात काही गोष्टी चांगल्या घडतानाही दिसत आहेत. लोकांमधली माणुसकी यामुळे समोर येत आहे. याची प्रचिती नुकतीच आली.
बुलंदशहरमधील रविशंकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी करोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने घरी येणे टाळले. त्यामुळे अंत्यसंस्काराची मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, शेजारील मुस्लीम बांधव पुढे आले आणि त्यांनी प्रेताला खांदा देण्यापासून पुढील सर्व अंत्यसंस्कार केले.
The true Soul & spirit of India. This is the #IdeaofIndia we are pledged to preserve, protect & defend. https://t.co/8Bhi4wm6HD
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 29, 2020
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ट्विटरवरून या घटनेची दखल घेत, हीच खरी ‘आयडिया ऑफ इंडिया’ असल्याचं म्हटलं. दरम्यान, करोना सर्वत्र पसरू नये म्हणून लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुख-दु:खाच्या कुठल्याच कार्यक्रमाला गर्दी न करण्यास सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र कोणतीही भीती न बाळगता या मुस्लिम बांधवांनी केलेली मदत खरोखरच कौतुकास्पद आहे.