नवी दिल्ली : देशामध्ये करोनाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. या करोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांचा बळी गेला आहे. मात्र या करोनाची अनेकांना धडकी भरली असून आपल्याच रक्ताच्या नात्यांचा विसर पडला. अनेकांनी तर नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्वीकारण्यास कोणी आले नाही आणि आता करोना मृतांच्या नातेवाईकांना जी मदत केली जात आहे, ती घेण्यासाठी एकाच व्यक्तीच्या तीन-तीन लोकांनी त्यासाठी क्लेम केल्याची घटना समोर आली आहे.
करोनामुळे मृत्यू झाल्यावर रुग्णांकडे पाठ फिरवणारे नातेवाईक आता मात्र मदत मिळावी म्हणून कायदेशीर बाबी करण्याची खटपट करताना पाहायला मिळत आहेत. यामुळे प्रशासनाच्या कामकाजात अनेक समस्या निर्माण होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पारू येथील एका कुटुंबातील वृद्ध व्यक्तीला करोनाची लागण झाली होती.
उपचारासाठी कुटुंबीयांनी त्यांना एसकेएमसीएच रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यानंतर करोनाचा संसर्ग आपल्याला देखील होईल या भीतीने साधंकोणी त्यांना रुग्णालयात पाहायला देखील आले नाही किंवा त्यांच्या तब्येतीची विचारपूरसही केली नाही. दरम्यान वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतरही त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईक पुढे आले नाही.
पण आता करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मिळणारी मदत मागण्यासाठी मात्र कुटुंबीयामध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. वृद्धाच्या पत्नीचे देखील निधन झाले आहे. त्याला तीन मुले आणि मुली आहेत. त्या तिघांनीही आता मृत्यूनंतर मिळणाऱ्या मदतीसाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
पतीचा मृत्यू झाला तर पत्नीला आणि पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला अशा स्वरुपाची मदत मिळते. मात्र हे दोघेही नसल्यास पुढच्या पीढीला म्हणजेच त्यांच्या मुलांना ही रक्कम मिळते. त्यामुळे मृत्यूनंतर आता मुले मदतीसाठी पुढे आली आहेत. मुलांच्या या कृतीवर सध्या सर्वत्र टीका केली जात आहे.