मुंबई – अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेते रिचर्ड गीर एप्रिल 2007 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेले असताना एका कार्यक्रमात त्यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मिठीत घेऊन तिच्या गालावर दीर्घ चुंबन दिल्याच्या प्रकरणातून न्यायालयाने शिल्पा शेट्टीची नुकतीच मुक्तता केली. ही शिल्पाला मिळालेला न्याय म्हणायचा की न्यायव्यवस्थेचा विनोद की समस्त भारतीय जनतेची थट्टा असा प्रश्न निर्माण होतो.
या प्रकरणातून तीन मुद्दे उपस्थित झाले आहेत.
1) भारतीय कायदा प्रक्रिया चीड यावी इतक्या धीम्या गतीने काम करत असते.
2) उगाचच प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींना कायदेशीरबाबीत कसे अडकवून ठेवायचे हे देखील यातून दिसून येते.
3) कुठलेही गांभीर्य, मूल्य नसलेल्या वादांना उत्तेजन कसे देऊ नये हे या प्रकरणातून पुढे येते.
ही घटना घडली 15 एप्रिल 2007 रोजी. रिचर्ड गीर आणि शिल्पा शेट्टी यांनी एका कार्यक्रमात मंचावर एकमेकांना मिठी मारली आणि त्यावेळी रिचर्ड यांनी शिल्पाच्या गालाचे चुंबन घेतले होते. यावरून अश्लिलतेचे प्रदर्शन केल्याचे तीन खटले शिल्पा शेट्टीच्या विरोधात दाखल करण्यात आले होते.
त्यापैकी दोन राजस्थानात तर एक उत्तर प्रदेशात दाखल करण्यात आला होता. यातील एका खटल्यासंदर्भात मुंबईतील बेलार्ड पीअर मेट्रोपोलिटन न्यायालायातील दंडाधिकारी केतकी चव्हाण यांनी शिल्पाची एका खटल्यातून मुक्तता करताना तिला या प्रकरणात बळी बनवल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. यासंदर्भातील तक्रारीत कथित गुन्ह्याबाबतचा एकाही मुद्द्याचा समावेश नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर भारतीय दंड संहितेच्या 34 व्या कलमाअंतर्गत आरोपीवर कारवाई करता येईल.
अशी कोणतीही कागदपत्रे अंतिम अहवालात सादर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शिल्पा शेट्टीवरील आरोप तथ्यहीन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर यासंदर्भातील आणखी दोन खटले अजून प्रलंबित असल्याची आठवणही न्यायालयाने करून दिलेली आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात 14 मार्च 2008 मध्ये रिचर्डच्या बाजूने दिलेल्या आदेशात या प्रकरणाच्या तक्रारीत कुठलेही गांभीर्य नसून केवळ प्रसिद्धीसाठी तक्रार करण्यात आली असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. आता मेट्रोपोलिटन दंडाधिकाऱ्यांच्याप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाने भूमिका घेतली तर यासंदर्भात तक्रार करणाऱ्यांना मोठी दंड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दिरंगाई होण्यास एक कारण म्हणजे हे सर्व खटले मुंबईतील न्यायालयात वर्ग करण्यात यावेत असा अर्ज शिल्पा शेट्टीने केला होता. त्यासाठीचे कागदोपत्री काम पूर्ण करण्यात सुमारे सहा वर्षे गेली.
दिल्लीत झालेल्या कार्यक्रमातील व्हिडिओ क्लिप्स काही न्यूज चॅनेलवरून दाखवण्यात आल्यानंतर कथित संस्कृतीरक्षक जागे झाले. एडसविषयीच्या जागृती कार्यक्रमासाठी रिचर्ड गीर भारतात आले होते. ते अमेरिकेहून इथे या कामासाठी आल्याबद्दल
त्यांना धन्यवाद द्यावेत असे आवाहन शिल्पा शेट्टीने प्रेक्षकांना केल्यानंतर कृतज्ञता म्हणून रिचर्ड यांनी प्रथम तिच्या हाताचे चुंबन घेतले. नंतर तिला मिठी मारून तिच्या गालाचे चुंबन घेतले. एडस् संदर्भातील जनजागृती कार्यक्रमाला दिल्लीतील सुमारे चार हजार ट्रकचालक उपस्थित होते. केवळ शिल्पा शेट्टीच नव्हे तर मिलिंद सोमण, मधू सप्रे, अक्षयकुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल, इरफान खान अशा अनेक सेलिब्रिटींना अशा प्रकारच्या तक्रारींना सामोरे जावे लागले आहे.