संगमनेर -करोनाच्या संकटामुळे सर्वात जास्त अडचणीत सापडलेल्या गरीब, कामगार, स्थलांतरीत मजूर, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी कॉंग्रेसने देशव्यापी ऑनलाईन राबविलेल्या “स्पीक अप इंडिया’ ला मोहिमेला महाराष्ट्रातही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकारपर्यंत या समाजघटकांचा आवाज नक्कीच पोहचला असून झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने आतातरी जागे व्हावे आणि या घटकांना मदत करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत राबविलेल्या या ऑनलाईन मोहिमेत राज्यातील मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी, जिल्हा, तालुका पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने ट्विटर, फेसबुक, युट्यूब,इस्टाग्रामवरून या मोहिमेत सहभाग घेतला. गरिबांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करावेत व पुढील सहा महिने प्रतिमहा 7 हजार 500 रुपये द्यावेत, स्थलांतरीत मजुरांना सुखरुप घरी पोहचवण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी.
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना आर्थिक मदत द्यावी तसेच मनरेगातर्फे 200 दिवसांचा रोजगार द्यावा, या मागण्या या स्पीक अप इंडिया कॅम्पेनच्या माध्यमातून केल्या आहेत.देश सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून लॉकडाऊनमुळे कामगार ,गरिब, हातावर पोट असलेले, शेतकरी, लघु उद्योजकांना मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे.
या राष्ट्रीय संकटात केंद्र सरकारने सढळ हस्ते मदत करुन पीडित घटकांना आधार देण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणूनच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी कॉंग्रेसने स्पीक अप इंडिया ऑनलाईन मोहीम राबवली. सामान्य जनतेचा हा आवाज केंद्र सरकारचे कान नक्की उघडेल असे ना. थोरात म्हणाले.