ओतूर – महाशिवरात्रीनिमित्त पुणे, अहमदनगर आणि ठाणे या तीनही जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या सत्यवादी राजा हरिश्चंद्रने राणी तारामतीकरिता बांधलेल्या हरिश्चंद्र गडावरील हेमांडपंथी शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यातून भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी हरिश्चंद्र गड भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता.
हे ऐतिहासिक ठिकाण असून या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या डोंगर कड्यांतून पाऊलवाट आहे. चार डोंगर चढण-उतरण करून मग शिवमंदिर येते. प्रतीवर्षी ठिकठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने येतात. ठाणे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील माळशेजघाट माथ्याजवळून खिरेश्वर गावातून पाऊलवाट आहे. पुढे गेल्यावर तोलारखिंड हा अवघड चढण रस्त्याचा मार्ग आहे.
या मार्गाने मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी आले होते. महाशिवरात्रीनिमित्त गडाच्या पायथ्याशी पुणे जिल्ह्याच्या हद्दीत खिरेश्वर गावात पुरातन नागेश्वर मंदिराजवळ ग्रामस्थांतर्फे आठ दिवस हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. यादरम्यान कीर्तने, भारुडाचे आयोजन केले होते. याठिकाणी यात्रा भरली होती.
गडावर येणाऱ्या भाविकांकरिता श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ओतूर, आम्ही संभाजी प्रतिष्ठान, कृपासिंधू स्वामी समर्थ प्रतिष्ठान आळेफाटा, श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने भाविकांना सरबत, मोफत खिचडी, केळी, फराळ, ताक, लस्सी वाटप करण्यात आले. भाविकांच्या आरोग्यसेवेकरिता मढ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रातर्फे आरोग्य सेवा देण्यात आली.
आरोग्य पथकाद्वारे दोन दिवसांत भाविकांना आरोग्य सेवा देण्यात आली. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पराशुराम कांबळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.