नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून भारतात करोना संक्रमित रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. करोना रूग्णांचे घटते प्रमाण पाहून डाॅक्टरांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे. देशात करोना लस येण्याआधीच भारतीयांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली असेल, असे एम्सचे संचालक डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
करोनाबाबत माहिती देताना डाॅ. गुलेरिया म्हणाले की, भारतात सध्या ज्या प्रकारची स्थिती आहे त्यावरून असे म्हणू शकतो की, देशात करोना लस येण्याआधीच भारतीयांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली असू शकते. करोनाचे स्वरूप बदलणार नाही. आगामी काळात आपण अशा टप्प्यावर पोहोचू शकतो की जेथे देशातील नागरिकांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती इतकी वाढू शकते की, त्यांना लसीची गरजही भासणार नाही.
करोना रूग्णांचे कमी होणार प्रमाण ही दिलासादायक बाब आहे. तरी देखील थंडीच्या काळात सावध राहणे महत्वाचे आहे. थंडीच्या दिवसांत थंड हवामानातील प्रदूषणामुळे करोना विषाणू जास्त काळ हवेमध्ये राहू शकतो. त्यामुळे धोका होऊ शकतो. आपल्याला जर थंडीच्या दिवसांत करोनापासून दूर रहायचे असेल तर सामाजिक अंतर राखणे, सतत मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात धुणे याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे डाॅ गुलेरिया यांनी म्हटले आहे.
भारताची कोविड रूग्ण संख्या 87 लाख 73 हजारावर
देशात गेल्या 24 तासात करोनाचे 44 हजार 684 नवीन रूग्ण आढळून आल्यामुळे देशातील एकूण करोना रूग्णांची संख्या 87 लाख 73 हजार 479 वर गेली आहे. तर गेल्या 24 तासांत 520 रूग्ण दगावल्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 1 लाख 29 हजार 188 इतकी झाली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने आज सकाळी करोनाच्या संबंधातील ताजी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार देशात सध्या करोनाचे एकूण सक्रिय बाधित 4 लाख 80 हजार 719 इतके झाले आहेत. देशात गेल्या 24 तासात एकूण 9 लाख 29 हजार 491 करोना चाचण्या केल्या गेल्या त्यामुळे चाचण्यांची एकूण संख्या आता 12 कोटी 40 लाख 31 हजार 230 इतकी झाली आहे.