आपले विचारच आपल्याला घडवत असतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधित्व आपले विचारच करत असतात. आपण इतरांना आवडत नाही अथवा परिस्थितीला दोष देत; दुःखी कष्टी होणाऱ्या व्यक्तींची संख्या खूप आहे; परंतु आपल्याला दुःख किंवा वेदना देण्यासाठी कोणी एक व्यक्ती अथवा परिस्थीती कारणीभूत नसते तर आपल्या स्वतःचेच विचार त्यासाठी कारणीभूत असतात. माणसाच्या दुःखाचे मूळ हे त्याच्या चुकीच्या विचारपद्धतीत शोधून; जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांनी विवेकनिष्ठ उपचार पद्धती म्हणजेच रॅशनल इमोटीव्ह बिहेव्हिअर थेरपी (आरईबीटी) जगभरात लोकप्रिय केली.
आपल्या सगळ्या अप्रिय व त्रासदायक भावना आणि अतार्किक वर्तन यामागे आपले अतिरेकी विचार लपलेले असतात. या मुख्य तत्त्वावरच डॉ. अल्बर्ट एलिस यांची आरईबीटी आधारलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत मी प्रत्येक गोष्ट ही उत्तमच केली पाहिजे नाहीतर मी कुचकामी आहे, प्रत्येक व्यक्तीने माझ्याशी चांगले व आदरानेच वागले पाहिजे व असे न झाल्यास ते लोक वाईट आहेत तसेच आयुष्यात प्रत्येक गोष्ट विना अडथळे अगदी सहजगत्या मला मिळालीच पाहिजे तसे न घडल्यास मी ते सहनच करू शकणार नाही आणि यामुळे माझ्या आयुष्याला अर्थच राहणार नाही; हे तीन “च’ म्हणजेच “मस्ट’.. असे झाले”च’ पाहिजे या अतिरेकी व अविवेकी विचारांमध्येच आपल्याला येणारे ताण, सतावणाऱ्या चिंता, राग, नैराश्य यांचे मूळ दडले आहे.
डॉ. अल्बर्ट एलिस यांचा त्यांच्या एका पुस्तकातील प्रसंग- डॉ. एलिस हे बाल वयात एका दुर्धर आजाराने ग्रासले होते त्यामुळे त्यांना वरचेवर बऱ्याच कालावधीसाठी इस्पितळात दाखल व्हावे लागे; चिल्ड्रन्स वॉर्ड असल्याने त्या वॉर्डातील इतर मुलांशी त्यांची मैत्री छान झाली, एका सांध्यांकाळी सर्व मुले खूप कंटाळली होती अशा वेळी डॉ. एलिस यांनी मुलांसमवेत एक खेळ खेळायचे ठरविले, हा खेळ असा होता की, प्रत्येक मुलाने आपल्या आयुष्यात आपल्याला वाटणाऱ्या अडचणी ज्यामुळे आपण दुःखी होतो त्या सांगायच्या व त्यातून आपण स्वतःच त्यातील सकारात्मक बाजू शोधून काढायची. तेथील सर्व मुलांना प्रथम हा खेळ जरा चमत्कारिकच वाटला, परंतु खेळ सुरू झाल्यावर सर्व मुलांनी त्याचा आनंद घेतला.
यातील एका मुलाने आपली अडचण सांगितली, की माझे आई वडील स्वतःच्याच दुनियेत मश्गूल असतात, सतत कामात व्यस्त असतात व त्यांचे माझ्याकडे काहीच लक्ष नाही, ते मला अजिबात वेळ देत नाहीत यामुळे तो मुलगा खूप दुःखी होता त्यातून खेळाच्या नियमाप्रमाणे त्याला स्वतःलाच या अप्रिय नकारात्मक भासणाऱ्या गोष्टीतील सकारात्मक बाजू शोधून काढायची होती; बऱ्याच विचारांती अचानक घबाड लागावे तसे त्याला सकारात्मक विचार सापडला. तो मुलगा म्हणाला की माझे असे अनेक मित्र आहेत ज्यांचे आई वडील त्यांना अजिबात मोकळीक देत नाहीत, सतत अति काळजी करतात, अति लाड करतात त्यामुळे ते आई वडिलांवर सतत अवलंबून असतात व मोकळीक न मिळाल्याने सतत संतप्त राहतात, परंतु माझ्या बाबतीत तसे नाही, माझे आई वडील माझ्याकडे लक्ष देत नाहीत ही तर माझ्यासाठी जमेची बाजू आहे; मी माझे स्वातंत्र्य उपभोगू शकतो, यातूनच मी स्वावलंबी बनू शकतो, एक जबाबदार मुलगा बनू शकतो.
अशाचप्रकारे आपणही नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये बदलू शकतो.
प्रथम “च’ – मी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक गोष्ट उत्तम’च’ केली पाहिजे व असे न घडल्यास मी निरर्थक आहे. या ठाम समजुतीमुळे मनात ताण, भीती, चिंता, खिन्नता, निराशा या सर्व टोकाच्या भावना निर्माण होतात.
सकारात्मक स्वगत – मी एक मर्यादा असलेला माणूस आहे त्यामुळे प्रत्येक वेळी माझ्याकडून उत्तमच कार्य घडेल असे नाही, माझ्याकडून चुका घडू शकतात व त्यातून माझा अनुभव दांडगा होतो.
दुसरा “च’ – कोणत्याही परिस्थितीत इतरांनी मला चांगले व आदरानेच वागविले पाहिजे तसे न झाल्यास ते लोक मुळातच वाईटच आहेत व ते माझ्याशी कायमच वाईट वागणार व मला या गोष्टीचा खूप त्रास होणार. या ठाम धारणेमुळे मनात अतीव राग, द्वेष, खुन्नस, मत्सर अशा भावना उद्दीपित होतात.
सकारात्मक स्वगत- समोरची व्यक्ती कोणत्या कारणामुळे माझ्याशी अशी वागली याचा तर्कशुद्ध विचार करून मी माझे कुठे चुकले हे शोधून भविष्यात माझ्याकडून तशी चूक न होण्यासाठी प्रयत्न करेन. प्रत्येकाचे विचार भिन्न असल्यामुळे माझे विचार व वर्तन काहींना पटणार नाही; नेहमी मी सगळ्यांच्याच खास मर्जीतला बनू शकत नाही परंतु मी समोरच्याच्या विचारांचा व भावनांचा आदर मात्र नक्कीच करू शकतो.
तिसरा “च’ – माझे आयुष्य कायम माझ्या मनासारखे, विना अडथळ्यांचे व सुखीच असले पाहिजे. ते तसे नसेल तर मी बिकट वाटणाऱ्या परिस्थितीचा सामना करूच शकणार नाही, मला जगणे अवघड होईल व अंतिमतः मी नैराश्यात जाईन. अशा अविवेकी धारणांमुळे निराशा, भीती, चिंता, स्वतःची कीव करणे, राग या भावनांचा उद्वेग होतो.
सकारात्मक स्वगत – आयुष्यात अनेकदा मला नकोशा वाटणाऱ्या घटना घडणार आहेत परंतु तेव्हाही मी तर्कशुद्ध विचार करेन कारण अतार्किक विचारांमुळे बिकट वाटणारी परिस्थीती अतिरेकी रूप धारण करेल. माझे सुख हे माझ्या तर्कशुद्ध विचारांवर अवलंबून आहे.
आरईबीटी नुसार-
आपण बिनशर्त स्वतःचा स्वीकार करून स्वतःकडून टोकाच्या अपेक्षा व अतार्किक स्वगत करण्यापेक्षा; हे भयंकर आहे ऐवजी हे एवढेही वाईट नाही असा विचार करावा. अतिरेकी विचारांचा ताबा विवेकनिष्ठ विचारांना घेऊ द्यावा असे केल्यास आनंदाने जगणे निवडता येऊ शकते. स्वतःचा माणूस म्हणून स्वीकार करून स्वतःवर प्रेम करा.
– मृणाल घोळे मापुस्कर
चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ