लाहोर – भारतीय संघाचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन सातत्यपूर्ण कामगिरी करत असूनही त्याला संघातून वारंवार का वगळले जाते. सध्याच्या काळात त्याच्या इतकी गुणवत्ता असलेला अन्य ऑफस्पिनर माझ्या पाहण्यात नाही, असे मत व्यक्त करत पाकिस्तानचा माजी कसोटीपटू व अव्वल ऑफस्पिनर सकलेन मुश्ताक याने बीसीसीआय तसेच निवड समितीवर टीका केली आहे.
भारतीय संघात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही फिरकी गोलंदाजांची नवी जोडी आल्यानंतर अश्विनकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्याला एकदिवसीय तसेच टी-20 संघात स्थान मिळणेही मुश्किल झाले.
या दोघांनी सरस कामगिरी केली आहे हे मला मान्य आहे पण त्यामुळे अश्विनचा दर्जा कमी होत नाही. माझ्या मते तो आजही जागतिक क्रिकेटमधील सर्वात अव्वल ऑफस्पिन गोलंदाज आहे.
हे दोघे संघात असतानाही डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा देखील काही सामन्यात संघात स्थान मिळवतो मात्र, अश्विनला स्थान मिळत नाही. भारताकडे अश्विनसारखा गोलंदाज असताना त्याला संघातून बाहेर कसे काय ठेवू शकता, अशीही विचारणा सकलेनने केली आहे.