मुंबई : करोनामुळे भविष्यात निदान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तरी घरातूनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) ही नित्याची गोष्ट होवून जाईल. त्यामुळे राज्यातील माहितीचे संरक्षण आणि सुरक्षा, चांगले इंटरनेट नेटवर्क यांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान असेल. या सर्वांचा विचार करुन यासंदर्भातील पायाभूत सुविधा उभारणे व घरातून काम करण्याच्या नियमांची चौकट तयार करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील यांनी व्यक्त केले.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची सद्यस्थिती व करोना नंतरच्या काळातील रोडमॅप निश्चित करण्यासंदर्भात आज केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद व केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची भविष्यातील वाटचाल व धोरण या संदर्भात राज्यमंत्री पाटील यांनी विविध सूचना केल्या.
सतेज पाटील म्हणाले, येत्या काळामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये डिजिटलायझेशनची वाढ होणार आहे. अशावेळी सायबर गुन्ह्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन ही समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि हेल्थकेअर क्षेत्रात बरचे नवीन संशोधन केले आहे. या संशोधकांना किंवा संशोधन संस्थांच्या नवनवीन शोधांना मंजूरी देण्यासाठी तसेच ते प्रत्यक्षात वापरात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक खिडकी योजना आखावी.
जेणेकरुन करोना नंतरच्या काळात नवनवीन संशोधन करण्यासाठी संशोधकांना प्रोत्साहन मिळेल. भविष्यात व्हर्च्युअल शिक्षण हेच सर्वव्यापी असेल. त्यामुळे त्या दिशेने वाटचाल करताना सध्या वापरत असलेल्या तंत्रज्ञानामध्ये काही समस्या आढळतात. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने देशात तयार झालेले स्वदेशी तंत्रज्ञान सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत उपलब्ध करुन द्यावे. तसेच याबाबत मार्गदर्शन व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्याही त्यांनी केल्या.