पुणे- करोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने ट्रेन्सचे क्रमांक बदलून “कोविड स्पेशल ट्रेन्स’ सुरू केल्या. या नावाखाली भाडेवाढही लादण्यात आली. मात्र, आता सर्वत्र अनलॉक होत असताना या ट्रेन धावत आहेत. शिवाय, तिकीटदर पूर्वीप्रमाणे न ठेवता तोदेखील “वाढीव’ लादला जात आहे. यातून रेल्वे मालामाल होत असताना प्रवाशांना मात्र भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ऐवजी मागील दीड वर्षांपासून “विशेष’ सेवा सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांना कोणत्याही सवलतींशिवाय आणि विशेष भाडेदरासह प्रवास करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलतदेखील नाकारली जात आहे. या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वेऐवजी नियमित रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
रेल्वे प्रशासनाने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च 2020 पासून रेल्वेने प्रवाशांसाठी विविध निर्बंध लागू केले. त्यानंतर आरक्षित तिकीट असल्यासच नागरिकांना प्रवासाची मुभा होती. या दरम्यान नियमित सेवा स्थगित केल्याने रेल्वेने विशेष ट्रेन्सचे संचलन सुरू केले. शिवाय, लहान मुलांचे अर्धे तिकीटदेखील मिळत नसल्याने पूर्ण भाडे भरावे लागत आहे.
विशेष आणि उत्सव विशेष रेल्वेंचे मार्ग, थांबे पूर्वीप्रमाणेच आहेत. परंतु, रेल्वेचे क्रमांक आणि तिकिटाच्या रचनेत बदल झाला आहे. याशिवाय मात्र या रेल्वेत नियमित पासेस, तिकीटे, सवलती देण्यात येत नसल्याने, प्रवाशांना पात्र असूनही पूर्ण रकमेसह तिकीट काढावे लागत आहे. पर्यायाने प्रवास खर्चात वाढ होत आहे. हा भुर्दंड टाळण्यासाठी रेल्वेने लवकरात लवकर नियमित रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी आणि संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.
करोना काळात अगदी सुरुवातीच्या टप्प्यात रेल्वे डब्ब्यांत सॅनिटायझेशन केले जात होते. नंतर, मात्र प्रशासन तशी स्वच्छता करत असल्याचे दिसून येत नाही. शिवाय, सिटींग तिकीट घेतले असता, सोशल डिस्टन्सिंग नियम पाळले जात नाहीत. शिवाय, फेरीवाले आणि अन्य किरकोळ विक्रेते, तृतीयपंथीयांचा सुळसुळाट असतो. त्यातून करोना संसार्गाची भीती असते. अशावेळी जर रेल्वे प्रशासन वाढीव भाडे आकारत असेल, तर काही सुविधांबद्दल खबरदारी घेणेही आवश्यक आहे. अन्यथा आमच्यावर लादलेले वाढीव भाडे कमी करावे.
– राधिका इनामदार, प्रवासी
नवीन नियमानुसार तिकीट आरक्षित करणे बंधनकारक असल्याने प्रवास करणे सोयीचे झाले आहे. ऑनलाइन तिकीट काढताना शुल्क आणि अन्य करांसह वाढणारी तिकीट किंमत मोजावी लागत आहे. आता देशभरातील बहुतांश व्यवहार खुले झाले आहेत. नियम देखील शिथिल झाले आहेत. त्यामुळे आता रेल्वेने देखील नियमित रेल्वे सुरू करणे आवश्यक आहे.
– नेहा खटावकर, प्रवासी